ठाणे : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यावर शिवसेनेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणुकांसाठी पक्षाने आत्तापासूनच संघटनात्मक आणि राजकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे.
याच अनुषंगाने ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या कदम यांच्याकडे ठाणेसह पालघर जिल्ह्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत नंदनवन येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत “संपर्क मंत्री अभियान” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी १२ मंत्र्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.
यापूर्वी पार पडलेल्या काही जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राज्यात भाजप पहिल्या क्रमांकावर तर शिंदे गटाची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. या पार्श्वभूमीवर पक्षाने संपूर्ण राज्यात संपर्क अभियानाला गती दिली आहे. ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा केंद्रबिंदू मानला जात असल्याने येथे विशेष रणनीती आखली जात आहे.
ठाणे महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर आणि मुरबाड या भागांत शिवसेनेचे मजबूत अस्तित्व आहे. मात्र, मागील पालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या संघर्षामुळे अंबरनाथ आणि बदलापूर येथे नगराध्यक्षपद भाजपकडे गेले होते. या अनुभवातून धडा घेत यावेळी मतांचे रूपांतर प्रत्यक्ष विजयात करण्यावर भर दिला जाणार आहे.
योगेश कदम यांना देण्यात आलेली जबाबदारी केवळ निवडणूक व्यवस्थापनापुरती मर्यादित नसून संघटन विस्तार, स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय, इच्छुक उमेदवारांची निवड, तसेच बूथस्तरापर्यंत यंत्रणा सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुका, गाव आणि गण पातळीवर शिवसेनेची पकड अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. श्रीकांत शिंदे यांचा ठाणे व कल्याण-डोंबिवली परिसरातील प्रभाव लक्षात घेता, स्थानिक नेतृत्व आणि संघटन यांचा समन्वय साधत मोठी निवडणूक मोहीम उभारण्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाकडून जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि बूथस्तरावरील कार्यकर्त्यांची पुनर्बांधणी, मतदार यादी तपासणी, प्रशिक्षण शिबिरे आणि संपर्क अभियान राबविण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यासाठी ठराविक लक्ष्य निश्चित करून जिंकण्याची टक्केवारी वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये इतर पक्षांचे पालकमंत्री आहेत, त्या ठिकाणीही मागे न हटता शासकीय समित्यांमध्ये शिवसेनेचे प्रतिनिधित्व वाढवण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
या मोहिमेअंतर्गत गुलाबराव पाटील (जळगाव, नंदुरबार), उदय सामंत (नाशिक, अहमदनगर), योगेश कदम (ठाणे, पालघर), प्रकाश आबिटकर (नांदेड, हिंगोली), भरतशेट गोगावले (बीड), आशिष जयस्वाल (जालना), प्रताप सरनाईक (अमरावती, अकोला), संजय राठोड (यवतमाळ, वाशिम), संजय शिरसाट (भंडारा, गोंदिया), प्रतापराव जाधव (नागपूर, वर्धा), शंभुराज देसाई (गडचिरोली, चंद्रपूर) आणि दादा भुसे (धुळे, बुलढाणा) यांच्यावर संबंधित जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
एकूणच, ठाणे जिल्ह्यातील आगामी निवडणुका लक्षात घेता शिवसेना संघटनात्मक बळकटी, स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव आणि आक्रमक रणनीती यांच्या जोरावर पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.























