मुंबई : सध्या वाढत्या उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांसमोर आता दुहेरी संकट उभे राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी) ने पुढील दोन दिवस मुंबई सोबतच ठाणे आणि पालघर परिसरात उष्ण व दमट हवामानासह हलक्या पावसाचा इशारा दिला आहे.
या बदलत्या हवामानामुळे उकाड्यात आणखी वाढ होणार असून नागरिकांना प्रचंड घाम आणि चिकटपणाचा त्रास सहन करावा लागू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ आणि २३ एप्रिल रोजी दुपारनंतर किंवा संध्याकाळी गडगडाटासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र या पावसामुळे गारवा मिळण्याऐवजी वातावरणातील आर्द्रता वाढून उकाडा अधिकच जाणवणार आहे.
ठाणे जिल्ह्यावर याचा विशेष परिणाम होण्याची शक्यता आहे. दिवसभर कडक ऊन आणि त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे दमटपणा वाढणार असून नागरिकांना अस्वस्थता जाणवू शकते. विशेषतः बदलापूर परिसरात दुपारच्या वेळेस तीव्र उकाडा आणि संध्याकाळी हलक्या पावसाच्या सरी अशी परिस्थिती राहू शकते, ज्यामुळे उष्णता आणि दमटपणाचा दुहेरी त्रास जाणवेल.
दरम्यान, पालघर जिल्ह्यात सुरुवातीला हवामान कोरडे राहणार असले तरी २४ एप्रिलपासून तिथेही ढग दाटून येण्यास सुरुवात होईल आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार दिवसा कडक ऊन पडेल, तर दुपारी किंवा संध्याकाळी ढग दाटून येऊन काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. अशी स्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. आर्द्रता वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, त्यामुळे पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. बाहेर पडताना डोक्यावर संरक्षण ठेवणे तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर न थांबणे, अशी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.























