मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठी पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व लाभार्थ्यांची निकषांनुसार तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम लाभार्थी निश्चित होणार आहेत.
राज्यात सुमारे १४ लाख लाभार्थी महिलांनी निर्धारित मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांचा योजनेतील लाभ आपोआप बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महिलांना यापुढे कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही योजना जुलै २०२४ मध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला लाखो महिलांनी अर्ज करून लाभ घेतला. मात्र मार्च २०२५ पासून निकषांनुसार तपासणी सुरू झाली. त्यामध्ये चारचाकी वाहन असलेल्या, कमी व जास्त वयोगटातील तसेच शासकीय नोकरीत असलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. तसेच एका कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला लाभ घेत असल्याचेही पडताळणीत समोर आले आहे. अशा प्रकरणांवरही कारवाई सुरू आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे ही प्रमुख अट आहे. मात्र अनेक लाभार्थी या निकषाबाहेर असल्याचेही तपासणीत आढळले आहे. ई-केवायसी प्रक्रियेसाठी यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. तरीही अनेकांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही. आता दुरुस्ती किंवा अंतिम संधी म्हणून ३० एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.























