कल्याण:- कल्याण तालुक्यातील रायते गावाजवळ कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनमधील सर्व ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उल्हास नदीवरील पुलावर प्रवासी व्हॅन आणि सिमेंट मिक्सर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि वाहनातील सर्व प्रवासी जागीच ठार झाले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन भावंडे मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत भावंडांचे वय १७ ते २२ दरम्यान असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एकूण ११ प्रवासी असून त्यामध्ये ८ पुरुष व ३ महिलांचा समावेश आहे. अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले, मात्र अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की कोणालाही वाचवता आले नाही.
सर्व मृतदेह गोवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना संपर्क करण्यात येत असून रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




















