बदलापूर:अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये आता महिलाराज येणार, हे निश्चित झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगराध्यक्षपदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली. त्यानुसार तर कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी तर अंबरनाथ नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठरले आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांचा कारभार महिलांच्या हाती येणार असून गेल्या काही महिन्यांपासून नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या अनेक राजकीय दिग्गजांचे स्वप्न भंगले आहे. दरम्यान, काही प्रमुख पुरुष नेते आता आपल्या पत्नींना उमेदवारी देण्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच प्रभागरचना अंतिम करण्यात आली होती. त्यानंतर मंत्रालयात सोमवारी राज्यातील सर्व नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत, बदलापूर नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी तर अंबरनाथ नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित झाल्याचे स्पष्ट झाले.
सन २०१५ नंतर या दोन्ही नगरपालिकांमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत. गेल्या पाच वर्षांपासून येथे प्रशासकीय राजवट आहे. मात्र यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने या निवडणुकीकडे ‘मिनी विधानसभा’ म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची जोरदार बढाओढ होती. शिवसेनेचे, भाजपाचे आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांच्या आकांक्षांवर पाणी फिरले आहे.























