बदलापूर:-मागील काही दिवसांपूर्वी कर्जत रेल्वे स्थानकावर यार्ड रिमोल्डिंग चे कामामुळे विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला. वाहतूक ब्लॉक समाप्त होऊन सुद्धा ट्रेन उशिरा येत होत्या त्यामुळे प्रवाशी संताप व्यक्त करत होते. कर्जत रेल्वे यार्ड रिमोल्डिंग चे काम येत्या तीन ते चार दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे अशी माहिती माजी. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.
गेले काही दिवस कर्जत रेल्वे स्थानकावर यार्ड रिमोल्डिंगच्या कामामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती. याचा चांगलाच फटका बदलापूर मधील प्रवाशांना मिळत होता. पहाटेपासून सकाळपर्यंत कर्जतहून येणाऱ्या लोकल विलंबाने येत होत्या. तसेच सायंकाळी सुद्धा लोकल अर्धा तास उशिराने येत होत्या त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते.
कर्जत स्थानकावर यार्ड रीमॉडलिंग चे काम सकाळी व सायंकाळी न घेता अन्य वेळात घ्यावे अशी मागणी कपिल पाटील यांनी केली. त्यावेळी तीन ते चार दिवसांत काम संपणार असल्याची माहिती मिळाली.
लोकल सेवांचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन दिले. बदलापूर रेल्वे स्थानकातील सरकते जिने व लिफ्ट बंद असल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोईंकडेही कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. त्यावेळी या संदर्भात रेल्वे स्थानकात काम करणाऱ्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या ( एमआरव्हीसी ) अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, असे आश्वासन हरेश मीना यांनी दिले.























