बदलापूर:-नगरपालिका निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. त्या अनुषंगाने आता राजकीय फुटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. प्रारूप मतदार यादीतील घोळा संदर्भात आता बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी मोठ विधान केलं आहे. बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीत शहराबाहेरील 17 हजार मतदारांची नावे आहेत. हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चांगलाच चोप देऊ असा इशारा वामन म्हात्रे यांनी दिला आहे.
शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला बाहेरच्या मतदारांना इशारा
कर्जत, चिखलोली, भिवंडी, शहापूर या ठिकाणचे बरेच बाहेरचे मतदार आहेत, त्या लोकांनी त्यांची नावे आपल्या प्रभागात खोटे पेपर तयार करून नोंदवले आहेत. हा देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे. अशी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. हेंद्रे पाडा, कात्रप, गावदेवी, खरवाई असेल या ठिकाणी त्या त्या नातेवाईकांची नावे नोंदवली आहेत. जर मतदाराने बाहेरून येऊन मतदान करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना त्या बुधवर उत्तर देणार आहोत. प्रत्येकाचा पत्ता, फोटो आमच्याकडे आहे. आम्ही नक्कीच त्याला चोप दिल्याशिवाय राहणार नाही. असे वक्तव्य शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी केलं आहे.
बोगस मतदार यादी
बदलापूर मध्ये प्रत्येक प्रभागात एकच नावाच्या अनेक मतदारांची नावे नोंदणी करण्यात आली असून बोगस मतदारांची संख्या मोठी आहे. तर बदलापूर शहरालगतच्या ग्रामीण भागातील तब्बल १७००० मतदारांची नावे बदलापूर शहराच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. खोटी कागदपत्रे देऊन मतदारांची नावे बदलापूर शहराच्या यादीत टाकण्यात आली असून याबाबत निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात आली आहे. या सर्व मतदारांसह त्यांची नावे टाकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बदलापूरचे शिवसेनाप्रमुख वामन म्हात्रे यांनी केली आहे.
बोगस मतदारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
यामध्ये मळंगड, बारवी परिसर, मुरबाड, शेलू, नेरळ, वांगणी, भिवंडी,शहापूर, कर्जत, आणि आसपासच्या ग्रामीण भागातल्या मतदारांचा मोठा समावेश असल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली आहे. तसेच हे मतदार जर मतदानाच्या दिवशी बोगस मतदान करायला आले, तर त्यांना चोप देऊ असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे, मतदानाच्या दिवशी जर कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल, अस वामन म्हात्रे म्हणाले आहेत.























