अंबरनाथ:-संध्याकाळचे साडेचार वाजले होते. रविवारचा (19 ऑक्टोबर) दिवस होता.अंबरनाथमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम सुरू होता.त्याचवेळी अंबरनाथमधीलच एका महिलेचा ॲब्युलन्सअभावी मृत्यू झाला.
तिची प्रकृती अचानक खालावली होती.पण वेळेवर ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने या महिलेला जीव गमवावा लागला.यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्याचवेळी आरोग्य सेवेच्या सुविधांवर प्रश्नचिन्हदेखील उपस्थित होत आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी (19 ऑक्टोबर) अंबरनाथ पश्चिमेकडील सर्कस मैदानात धर्मवीर आनंद दिघे नाट्य मंदिराचे उद्घाटनासाठी आले होते.त्यावेळी कार्यक्रमस्थळावर एक अॅम्ब्युलन्स उभी होती.अंबरनाथच्या स्वामी नगरमधील मीनाबाई सूर्यवंशी (66) यांची प्रकृती अचानक ढासळली.त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी त्यांना तातडीने उपचारासाठी छाया उपजिल्हा रुग्णालयात नेले.मात्र, प्रकृती गंभीर असतानाही वेळेवर ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे इतरत्र नेता न आल्याने उपचाराअभावी महिलेला जीव गमवावा लागला.
महिलेची खालावलेली प्रकृती पाहून त्यांना चांगल्या उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्याचा सल्ला छाया रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. मात्र, रहिवाशांनी रुग्णालयाकडे ॲम्ब्युलन्सची मागणी केली, तेव्हा एकमेव ॲम्ब्युलन्स उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी पाठवल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.त्यानंतर 108 वर कॉल करून ॲम्ब्युलन्ससाठी प्रयत्न करण्यात आले.पण,पलीकडून प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे अवघ्या अर्धा तासात महिलेला जीव गमावावा लागला.
या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला राजकीय कार्यक्रमासाठी सरकारी रुग्णालयाची ॲम्ब्युलन्स वापरण्यात येते,तर दुसरीकडे एक गंभीर रुग्ण तिच्या जीवासाठी झुंज देते.ॲम्ब्युलन्स वेळेवर उपलब्ध झाली असती तर महिलेचा जीव वाचू शकला असता,अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते महेश इनकर यांनी दिली आहे.या प्रकरणात संबंधित डॉक्टरांवर निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली.कठोर कारवाई झाली तरच अशा दुर्घटना भविष्यात टळतील,असे महेश इनकर यांनी सांगितले.
ही घटना माझ्या निदर्शनास आली असून मी याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार आहे.आमच्याकडे एकच ॲम्ब्युलन्स आहे आणि प्रोटोकॉलप्रमाणे ती उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी राखीव होती.
– डॉ. शुभांगी वाडेकर, अधीक्षक, छाया उपजिल्हा रुग्णालय
मीनाबाई यांची तब्येत खूपच गंभीर होती, पण अॅम्ब्युलन्स उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी वापरण्यात आली होती.आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले,पण वेळ निघून गेली होती.हे मनाला चटका लावणारे आहे.
– केशवन,रहिवासी























