बदलापूर (ता. ६) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बदलापूर पश्चिमेतील रमेशवाडी परिसरात यंदा अभूतपूर्व ‘भीमसागर’ उसळला. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी शांतता, शिस्त आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत एकत्र जमले.
शहरातील विविध प्रभागांतून महिला–पुरुषांसह लहान मुलांनी पांढरी वस्त्रे परिधान करून, हातात प्रज्वलित मेणबत्त्या घेत शांतता रॅलीत सहभाग नोंदवला. कोणत्याही गोंधळाविना सुसंघटित पद्धतीने काढलेल्या या रॅलीत सर्वत्र शिस्तबद्ध वातावरण पाहायला मिळाले. नागरिकांनी बाबासाहेबांना वंदन करत समानता, बंधुभाव आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांची प्रतीजाणीव करून दिली. पुतळ्याजवळ सामूहिक बुद्ध वंदना व पंचशील पठण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महापरिनिर्वाण दिनाची सकाळही तितकीच ऊर्जादायी ठरली. सकाळी स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले. भारतीय बौद्ध महासभा, बदलापूर शाखा तसेच बौद्धजन पंचायत समितीच्या विविध शाखांच्या हजारो अनुयायांनी उपस्थित राहून या स्मरण सोहळ्याला भव्यता प्राप्त करून दिली.
नागरिकांच्या शिस्तबद्ध आणि भावपूर्ण सहभागामुळे ‘भीमसागर’चा हा वार्षिक अनोखा समूह यंदाही ऐतिहासिक ठरला. श्रद्धा, अनुशासन आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत बदलापूर शहरात महापरिनिर्वाण दिनाचा उत्साह दिमाखात साजरा झाला.























