बदलापूर :- कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी १ एप्रिलपासून बदलापुरात प्लास्टिक पिशव्या बंदी मोहिमेची अंमलबजावणी सुरू करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत काही व्यापाऱ्यांनी आठवडाभर आधीच प्लास्टिक पिशवी बंदी मोहिमेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. इतर विक्रेते व व्यापाऱ्यांकडूनही असाच प्रतिसाद मिळाल्यास प्लास्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी अलीकडेच १ एप्रिल २०२६ पासून प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार बदलापुरातील व्यापारी व विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्या आढळल्यास त्या जप्त केल्या जाणार असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील विक्रेत्यांना व व्यापायांना पत्रकाद्वारे याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बदलापुरात भाजीपाला, फळे व इतर वस्तूंची विक्री करणारे शेकडो फेरीवाले, किराणा व इतर दुकानदार तसेच व्यापारी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असतात. अनेकदा कचऱ्यात टाकलेल्या अशा प्लास्टिक पिशव्या गुरांच्या पोटात जाऊन त्यांना आजार होतात. तसेच रस्त्यावर व इतरत्र पसरून शहराला बकालपणा येत असतो. पावसाळ्यात नाले, गटारे तुंबण्यासही या प्लास्टिक पिशव्या कारणीभूत ठरत असतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी केले आहे.
१ एप्रिल २०२६ पासून प्लास्टिक पिशव्या बाळगणाया व्यापारी व विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. प्लास्टिक पिशव्या बंदीच्या या निर्णयाबद्दल काही विक्रेते नाराजी व्यक्त करीत असले तरी काही विक्रेत्यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत करीत आठवडाभर आधीच प्लास्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या विक्रेत्यांनी नगर परिषदेने प्लास्टिक बंदी संदर्भात जारी केलेले पत्रक दुकानात दर्शनी भागात लावले असून प्लास्टिक पिशव्या मागणाऱ्या ग्राहकांना ते नगर परिषदेच्या मोहिमेची माहिती देत आहेत. तसेच कापडी किंवा कागदी पिशव्या आणण्याचे आवाहन करीत आहेत. व्यापारी व विक्रेत्यांनी प्लास्टिक बंदी मोहिमेला दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादाबद्दल पर्यावरण प्रेमी समाधान व्यक्त करीत आहेत.
वास्तविक पाहता सन २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिक मुक्तीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर कुळगाव बदलापूर नगर परिषदेनेही प्लास्टिक पिशव्या बंदीची मोहीम राबविली होती. या मोहिमेत नगर परिषदेच्या पथकाने मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंड वसूल केला होता. पुढे मात्र ही मोहीम थंडावली आणि पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला.























