बदलापूर(प्रतीक टोपले):-बदलापूर शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागात बलिप्रतिपदेच्या दिवशी गुरांना आगीवरून उडवण्याची पारंपारिक प्रथा आजही उत्साहात साजरी होते.
सर्व शेतकरी सकाळी लवकर गुरांना स्वच्छ धुवून सजवतात.बैलांची शिंगे रंगवली जातात,गळ्यात हार व माळा घातल्या जातात,अंगावर गेरू व रंगाने हाताचे ठसे उमटवले जातात,अंगावर गुलाल टाकले जाते,डोक्यावर गोंडे बांधले जातात व फुगे बांधले जातात. बलिप्रतिपदेच्या पारंपारिक दिवशी शेतकरी प्रार्थना करतात “इडा पिडा टलो,बळी राज्य यवो”.
हा सण केवळ धार्मिक नाही तर शेतकऱ्यांच्या मातीशी जुळलेला आहे. शेतकऱ्यांच्या कृतज्ञतेचे प्रतीक देखील आहे. पावसाळ्यानंतर भात शेती झाल्यावर गुरांना काम नसल्यामुळे ते सुस्तावले जातात. बली प्रतिपदेच्या दिवशी गुरांना आगे वरून उडवल्याने त्यांच्या पायांवरील रोग,अंगावर चिटकलेला पिसवा,गोचीड व इतर जीव जंतू नष्ट होतात.असे स्थानिक शेतकरी सांगतात.तसेच बलिप्रतिपदेच्या नंतर शर्यतींच्या बैलांना मैदानासाठी घेऊन जाण्याची परंपरा असते.
घरातील महिला शेणाची पाच गोळे तयार करून त्याच्यावर झेंडूची फुले ठेवून त्यांची पूजा करतात आणि ते गोळे घराच्या वर ठेवले जातात तसेच बळीराजाला प्रार्थना केली जाते “इडा पिडा टळो बली राज्य येवो”.
यावर्षी (दि.२२) जांभळे गावात हा उत्सव पारंपारिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.गावकरी गुरांच्या पूजनासह त्यांना आगीवरून उडवताना उपस्थित होते. उत्सवात गुरांना सजवण्याची प्रक्रिया,आगीवरून उडवणे,प्रार्थना व गुढीपाडव्याप्रमाणे उत्साह दिसून आला. शेतकरी आणि स्थानिक लोकांसाठी हा दिवस केवळ धार्मिक विधी नव्हे तर सांस्कृतिक वारसा आणि गुरांप्रती कृतज्ञतेचा दिवस मानला जातो.अशा पारंपरिक उत्सवांमुळे स्थानिक समाजात एकत्रित आनंद,भक्तिभाव आणि संस्कृती जपण्याची भावना कायम राहते.























