बदलापूर, दि. १२: विकासाचे राजकारण केले पाहिजे. कोण कुणाला किती शिव्या देते, टीका करते हे महत्त्वाचं नाही. पण कोण काम करतं हे जनता पाहते. टीकेला उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका, कामावर लक्ष द्या.असा थेट सल्ला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बदलापुरात दिला.
कुळगाव-बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बदलापूर (प.) येथील गौरी सभागृहात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार शिंदे प्रमुख मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील भाजप आणि शिवसेनेतील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष खासदार शिंदे काय बोलतात याकडे लागले होते. त्यांनी मात्र विकासाभिमुख राजकारणाचा संदेश देत कार्यकर्त्यांना कामातून उत्तर द्या असे आवाहन केले.
आपण लोकसभा, विधानसभा निवडणुका महायुती म्हणून लढलो. पुढील सर्व निवडणुका देखील महायुतीच्या माध्यमातून लढल्या पाहिजेत. एकमेकांशी संवाद ठेवून युती मजबूत करणे गरजेचे आहे, असे सांगत शिंदे यांनी महायुतीसाठी आपण तयार असल्याचे स्पष्ट केले. महायुतीतील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा युती कशी मजबूत होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. मात्र टाळी एका हाताने वाजत नाही; वरिष्ठांचे आणि स्थानिकांचे म्हणणे ऐकूनच युतीचा निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी नमूद केले.
मेळाव्यातील आणखी एक महत्त्वाचा क्षण म्हणजे भाजपचे माजी नगरसेवक अविनाश भोपी यांनी खासदार शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सध्याच्या भाजपात जुनी राष्ट्रवादीच राहिली आहे, अशी टीका करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्याने उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय रंगला.
या मेळाव्यात शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे, पदाधिकारी, संभाव्य उमेदवार आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. बदलापुरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.























