शिक्षक – आजचा निखालस संघर्ष योद्धा
शिक्षण क्षेत्रामध्ये आज जि प शाळा, मनपा नपा आणि अनुदानित, अंशअनुदानित शाळांमध्ये,स्वयंअर्थसाहित शाळांमध्ये मधील शिक्षकाच्या जबाबदाऱ्या पाहिल्यावर असं लक्षात येतं की शिक्षक हा खऱ्या अर्थाने एक संघर्ष योद्धा आहे. शिक्षक संघटनांनी त्यांच्या मागणीसाठी अनेक आंदोलने व धरणे धरली आहेत, तसेच उपोषण यासारखे लोकशाही मधील सगळी आयुध वापरलेली आहे. मात्र ही आयुध वापरण्याची त्यांच्यावर का वेळ आली तर शिक्षकांना अध्ययनाचे काम सोडून इतर अशैशणिक कामे ही बेसुमार आहेत आणि बऱ्याचदा ९०% प्रकरणांमध्ये शिक्षकांवर जी कारवाई झालेली आहे. ती अशैशणिक कामामुळे झालेली आहे.एखाद दुसरे उदाहरण असं असेल की ज्यामध्ये शिक्षकांनी गुणवत्ता दाखवली नाही किंवा अध्ययनात कमी पडला म्हणून त्याच्यावर कारवाई झाली इतर सर्व बाबींमध्ये अशैक्षणिक कामामध्ये काहीतरी खुसपट काढून शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई आजपर्यंत केलेली आहे.
ज्या देशाचे प्राथमिक शिक्षण हे मजबूत आणि मूल्यावर आधारित शैक्षणिक वाटचाल करत असते त्या देशाची प्रगती ही नेहमी द्रुतुगतीने आणि देशाच्या विकासाकरिता लांब पल्ल्याचा दगड ठरलेली आहे. आपल्या देशामध्ये शिक्षकाला आपल्या यंत्रणा एका शिपायासारखी वागणूक देत असतात. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल शासनाच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये किंवा शासनाच्या उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांशिवाय शासनाकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही या थाटात शिक्षकांना अशैशणिक कामासाठी जुंपले जाते. आणि ही अशैक्षणिक कामे शिक्षकांवर लादल्यामुळे आपल्या देशाच्या प्राथमिक शिक्षणाचा स्तर हा दिवसेंदिवस घसरत चालला असून विद्यार्थ्यांमध्ये कोवळ्या वयामध्ये जे संस्कार शाळेमध्ये व्हायला पाहिजेत ते शिक्षक शाळेत उपस्थित नसल्यामुळे होत नाहीत आणि विद्यार्थांना मध्ये बेशिस्तपणा, अनुपस्थिती, पट घसरणे,पर्यायाने अविवेक असलेले विद्यार्थी घडणे,पुढे या मधील काही विद्यार्थी मोठे झाल्यावर गंभीर गुन्हे करतात समाजकंटक होतात, समाजविघातक कृत्य करतात. (विविध ठिकाणी शाळेतील मुलांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत)आणि मग आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून स्वतःच, समाजाच आणि देशाचं अतोनात नुकसान होतं.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व यंत्रणांनी विविध उपक्रम किंवा नैसर्गिक आपत्ती तसेच इतर काही बाबींसाठी शिक्षकांच्या नेमणुका केल्या जातात. अशा
अशैशणिक कामकरिता शिक्षकांचा वापर करू नये. शिक्षक हे कोणत्याही यंत्रणेचे कामगार किंवा बॉण्डेड लेबर नसून ते समाजाच्या आणि राष्ट्राच्या निर्मिती करता पवित्र कार्य करणारे विभूती आहेत याची नोंद आणि भान या यंत्रणांनी ठेवले पाहिजे.निवडणूक व इतर कामांसाठी वेगळी यंत्रणा उभारून ही कामे व उपक्रम राबवू शकतात.
काही खाजगी यंत्रणा वैयक्तिक कामासाठी शिक्षकांचा वापर करत असतात. ते शिक्षक वर्गावर नसतात व पर्यायाने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो विद्यार्थ्यांना मग पहिली ते आठवी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे (पात्र करण्याचे) धोरण असल्यामुळे अगदी जुजबी अभ्यासक्रम शिकवला जातो. आणि त्याला पहिली ते आठवी मध्ये पास केला जातो. इयत्ता नववी दहावी मध्ये बरेच खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खाजगी शिकवण्या लावण्यासाठी प्रवृत्त करतात आणि मग त्या शाळांचे निकाल हे शंभर टक्के लागून, शाळेची गुणवत्ता बघा कशी आहे हे समाजामध्ये पसरवलं जातं किंवा त्या शाळा जिथे स्थापित आहेत त्या शाळेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आमच्या शाळेमध्ये कशी गुणवत्ता पूर्वक शिक्षण आहे याची जाहिराती केल्या जातात. मात्र हे सर्व खोटं आणि आभासी आहे.याची कल्पना पालकांना येत नाही आणि मग त्यांच्या विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे. पुढील शिक्षणामध्ये ही मुले मागे पडतात.दिशाहीन होतात आणि गुणवत्ता असून योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे पुढे नैराश्यामध्ये जातात.
शिक्षकांना विविध प्रकारची प्रशिक्षण ही शासनाने सातत्याने द्यायला हवी. तांत्रिक बाबी वापरण्याचे तंत्र शिक्षकांना अवगत करणेकरीता त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. शाळांमध्ये पूर्ण येणारे संगणक ई लर्निंग साहित्य याची देखभाल शिक्षकाला करावी लागते त्यामुळे शिक्षकांना स्वतःची पदरमोड करून ही संगणक यंत्रणा अद्यावत ठेवण्याची कसरत करावी लागते. त्यांच्यावर असलेला अतिरिक्त शालाबाह्य कामांचा भार हा कमी करायला हवा. शिक्षक वर्गावर जास्तीत जास्त वेळ कसे थांबतील हे धोरण विविध यंत्रणांनी अवलंबायला हवा.त्यामुळे खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्मितीचे काम हे अधिक जोमाने होऊ शकेल. यासाठी शासनाने बेरोजगार तरुणांना ही जबाबदारी देऊन, हे शिक्षक वर्गावर कसे थांबून विद्यार्थ्यांचा अध्ययन कसं करतील याच्याकडे भर दिला तर राष्ट्रनिर्मितीसाठी त्याचा फार मोठा उपयोग होऊ शकतो.
आजचा शिक्षक अनेक व्याधी आणि आजार घेऊन तो आपलं कर्तव्य बजावत असतो. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला संघर्ष करावा लागतो .मग ते त्याचे वेतन असेल, वेतन वाढ असेल, पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती असेल किंवा त्याची वैद्यकीय बिले असतील. निवृत्त झाल्यावर निवृत्त प्रति जे लाभ आहेत ते मिळवणे किंवा ज्यांना निवृत्ती वेतन आहे त्याकरता झगडावे लागते.यामुळे अलीकडे शिक्षकी पेशा हा कोणी आनंदाने स्वीकारत नाही आहे ही खेदाची बाब आहे. या संघर्ष योद्ध्याला शाळेत आल्यापासून शाळेचे वर्ग उघडणे,शाळा उघडणे साफसफाई करणे विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार तयार करणे. प्रसाधनगृह ची स्वच्छता, विद्यार्थी शाळेत आजारी पडला तर त्याच्यावर औषध उपचार, शहर,गाव खेड्यामधील स्थानिक कार्यक्रम, विविध समित्यांच्या सभा घेणे त्यांच्या नोंद वह्या ठेवणे. विविध शासकीय माहिती पाठवणे. ऑनलाईन माहिती पाठविणे, लेखापरीक्षण तसेच, शालेय तपासणी , वरिष्ठांची मर्जीनुसार कामे करणे, निवडणुकीची कामे करणे,शासकीय उपक्रम राबवणे स्वच्छता मोहीम राबवणे हागणदारीमुक्त योजना राबवणे, झाडे लावणे, शाळा परिसर स्वच्छ ठेवणे, अगदी करोना काळात तर शिक्षकांना नाक्या नाक्यावर उभे राहून वाहन तपासणी येणाऱ्या नागरिकांवर देखरेख ठेवणे क्वारंटाईन सेंटरवर नेमणुका तसेच स्थलांतरित मजुरांना भोजन व्यवस्था अशा प्रकारची शिपाई व मजुराची कामे लावलेली होती.
वास्तविक राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणी करता शिक्षकासमोर अनेक आव्हाने आहेत. यामध्ये विविध क्षमता आधारित संकल्पनांचे आकलन, संकल्पनांच्या वास्तविक जगात उपयोजन, अशा अनेक प्रकारची शिक्षण पद्धती या धोरणामध्ये दिलेली आहे. तिची अंमलबजावणी करण्याचं शिवधनुष्य शिक्षकाला पेलवण्यासाठी यंत्रणांनी शिक्षकांना सातत्याने परिणामकारक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. नुसती प्रशिक्षणा देऊन व प्रमाणपत्र देऊन चालणार नाही तर त्या प्रशिक्षणाचा तो शिक्षक आपल्या अध्यापनात कसा वापर करत आहे व विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी त्याचा किती परिणामकारक उपयोग होत आहे त्याचीही पडताळणी यंत्रणांनी करून शिक्षकाला पूर्णपणे वर्गावर शिकवण्याचे स्वातंत्र्य बहाल करावे.
वास्तविक करोना काळामध्ये शिक्षकांनी ऑनलाइन विद्यार्थ्यांचे अध्ययन केलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन बाबतीत कोणताही खंड पडला नव्हता.त्यामुळे विद्यार्थ्यांना अखंडित अध्यापन मिळाले.
असे सर्व असताना शिक्षकावर माध्यन भोजन, निवडणूक कमी निरंतर असलेली BLO duty. अशी इतर अनेक कामे लादली आहेत.तरीही या परिस्थितीतून हा शिक्षक संघर्ष करत मार्ग काढत आहे. विद्यार्थ्यांना प्रगत करत आहे, विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित होण्याकरता सर्व प्रकारचे आयुध शिक्षक त्यांना पुरवत आहे. आपले अध्यापनाचे काम अखंड तेवत ठेवत आहे.
अश्या या निखालस संघर्ष योध्याला शिक्षक दिनी मानाचा मुजरा आणि मनःपूर्वक शुभेच्छा🙏💐
विलास जडये
माजी शिक्षणविभाग प्रमुख
कुळगाव बदलापूर नगरपरिषद























