शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष
आमच्या साठी सोन्याचा क्षण- पदाधिकाऱ्यांची भावना
अंबरनाथ : महाराष्ट्रात मराठीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शनिवारी एकत्र आले. ५ जुलै २०२५ या दिवसाची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद झाली. दोन्ही ठाकरे एकत्र येताना पाहून अनेकांचे डोळे पाणावले. ‘याच साठी केला होता अट्टाहास’ असं म्हणतात अनेकांचा उर भरून आला. या घटनेनंतर अवघ्या महाराष्ट्रात जल्लोष साजरा करण्यात आला. अंबरनाथमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जल्लोष केला. अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना अभिवादन करून कार्यकर्त्यांनी भर पावसात आनंदोत्सव साजरा केला. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानं कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेठे भरवून आनंद व्यक्त केला. २० वर्षानंतर दोन्ही ठाकरे एकत्र आले हा क्षण आमच्या आयुष्यातील सोन्यासारख्या असल्याची भावना मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी व्यक्त केली. तर अंबरनाथ शहरातील ७० टक्के विखुरलेले मतदान यानिमित्ताने एकत्र आले, आता अटकेपार झेंडा रोवणार अशी भावना शिवसेना उबाठा, पूर्व विभाग शहर प्रमुख अजित काळे यांनी व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.






















