कल्याण: कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरकडून शिळफाट्यावरून महापे वरून जाणारी वाहने कल्याणमधील एमआयडीसीच्या जलवाहिन्या असलेल्या गणेश मंदिराच्या पायथ्याखाली असलेल्या खिंडीच्या रस्त्याने जातात
मनसेचे नेते व कल्याण ग्रामीण चे माजी आमदार राजू पाटील म्हणतात आपण आमदार होतो तेव्हा एमआयडीसी वाल्यांकडून स्वतः उभे राहून सुस्थितीत करून घेतला होता. पण आता विकासाचे गोडवे गणाऱ्यांच्या काळात या रस्त्यावर चंद्राचे खड्डे पडलेले आहेत की काय असा भास होतो. अशी टिका राजू पाटलांनी केली.
आपण आमदार झालो तेव्हा पहिले हा खिंडीतला रस्ता सुस्थितीत करून घेतला. कारण बदलापूर, कल्याण, डोंबिवली, आणि अवती भवतीच्या परिसरातील हलकी वाहने या रस्त्याने धावतात. हा जो रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला एमआयडीसीच्या जलवाहिन्या आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे वाहन चालकाला जीव हातात घेऊन वाहन चालवायला लागतात. शिळफाटा रस्त्याकडून नवी मुंबईकडे जाणारा मधला रस्ता आहे तिकडून हलकी वाहने भरभरात धावतात. आणि हा रस्ता एमआयडीसीच्या नियंत्रणाखाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करणे, रस्ता सुस्थित ठेवणे हे कामे एमआयडीसीचे आहेत. असे पाटील म्हणाले.
आता या रस्त्याची व्यवस्था खराब झाली आहे. विकासाच्या गप्पा मारणारे या महत्वपूर्ण रस्त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.या खड्ड्यांमुळे अनेक वाहन चालक मुंब्रा वळण रस्त्याने मग महापे दिशेने वाहने घेऊन चालवितात. हा रस्ता टेकडीवरून आहे. या रस्त्यावर एका खड्ड्यात एक म्हैस बसेल एवढ्या आकाराचे हे खड्डे आहेत. या खड्ड्यात आपटून एखादे वाहन पंक्चर झाले. ते लगतच्या जलवाहिन्यांना धडकले तर किती मोठा प्रसंग उद्भवू शकतो. याचे भान एमआयडीसी अधिकाऱ्यांनी ठेवावे. या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देण्यास आता विकासाच्या गप्पा मारणाऱ्या कोणालाच वेळ नाही. कारण त्यांना आता पडलय आपलीच सरंजामी वाचवायची कशी. अशा परिस्थितीत त्यांचे सुभेदार सकाळपासून आपल्या मतदारसंघात फिरत असतात, पण त्यांना प्रवाशांना त्रासदायक ठरणारा, एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना धोका निर्माण करणारा खराब रस्ता दिसत नाही का, असे प्रश्न माजी आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडीचे नष्टचर्य संपविण्यासाठी आताच विकास पुरूषांनी पुढाकार घ्यावा. महापालिका निवडणुका लागल्या की त्याच्या दोन महिने कल्याण, डोंबिवली, ग्रामीण भागात विकास कामांचा महापूर येईल, विकासाचा मोठा धबधबा वाहण्यास सुरूवात होईल, त्या गोष्टीला काही अर्थ नसतो. हे आता लोकांच्या शहराच्या विविध भागात सुरू असलेल्या रस्ते आणि इतर कामांवरून निदर्शनास आले आहे, असे पाटील यांनी सांगितले. जरा महापेकडे जाणाऱ्या कल्याण फाटा चौकातील टेकडीवरील रस्ता सुस्थितीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी या भागाकडे आमचे लक्ष आहे, हे दाखवून द्यावे, असा चिमटा पाटील यांनी समोरील स्पर्धकांना घेतला आहे.























