मुंबई : मुंबईकरांसाठी रेल्वेकडून मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर आता 12 डब्यांच्या लोकल गाड्यांऐवजी 15 डब्यांच्या लोकल ट्रेन धावणार आहेत. प्रवाशांकडून अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात होती आणि अखेर रेल्वे प्रशासनाने ती मान्य केली आहे.
मुंबई लोकल ही शहराची जीवनरेखा मानली जाते. मात्र दररोज होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचा प्रवास त्रासदायक ठरत होता. आता 15 डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांना अधिक जागा आणि आराम मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या 15 डब्यांच्या गाड्या मध्य रेल्वेच्या जलद आणि मंद दोन्ही मार्गांवर धावतील. सध्या सुरू असलेल्या 12 डब्यांच्या गाड्यांचे रुपांतर टप्प्याटप्प्याने 15 डब्यांमध्ये करण्यात येईल. प्रारंभी काही गाड्यांपासून ही प्रक्रिया सुरू होईल आणि पुढे त्यांच्या संख्येत वाढ करण्यात येईल.
या संदर्भात रेल्वेने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारणीची कामे सुरू केली आहेत. मध्य रेल्वे मंडळातील 34 स्थानकांवर प्लॅटफॉर्म वाढवण्याचे काम सुरू असून, त्यापैकी 27 स्थानकांवरील काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. काम पूर्ण झाल्यानंतर 15 डब्यांच्या गाड्या नियमित धावू लागतील.
विट्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कर्जत, खोपोली, भिवपुरी, पळसधरी, वाशिंद, आसनगाव, टिटवाळा, कसारा, मुंब्रा, कळवा, ठाकुर्ली, कोपर आणि डोंबिवली या प्रमुख स्थानकांवर काम वेगाने सुरू आहे. तसेच सीएसएमटी, ठाणे, कल्याण, वांगणी आणि खडवली येथेही विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी सांगितले की,
“मुंबई विभागातील 34 स्थानकांवर प्लॅटफॉर्म वाढवण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत 27 स्थानकांवरील काम पूर्ण झाल्यानंतर 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवली जाईल.”
या विस्तारामुळे प्रत्येक गाडीत प्रवाशांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल आणि गर्दीचा त्रास कमी होईल. कल्याणपासून खोपोली आणि कसारा दरम्यान धावणाऱ्या बहुतेक गाड्यांमध्ये हा बदल करण्यात येणार आहे.
दरम्यान, नववर्षात मध्य रेल्वेच्या ताफ्यात नवीन एसी लोकल गाड्यांचा समावेश होणार आहे. सध्या मध्य रेल्वेकडे सहा एसी लोकल गाड्या असून, त्या दररोज 80 फेऱ्या करतात. नवीन गाड्यांच्या समावेशामुळे हार्बर आणि मेन लाईनवर अधिक आधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव प्रवाशांना मिळणार आहे.























