बदलापूर:- आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपली कंबर कसली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक आघाडीच्या नावाने लढवणार आहेत.
आघाडीमध्ये आणखी विस्तार करत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय (आर. के.), भारत मुक्ती मोर्चा, आणि भारत राष्ट्र समिती (BRS) यांनाही सामावून घेण्याची तयारी सुरू असून, त्यामुळे आघाडीचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी सांगितले की, महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षालाही आघाडीत सामावून घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. या सर्व समविचारी पक्षांच्या एकत्रीकरणामुळे स्थानिक राजकारणात महत्त्वाचे समीकरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडीचे प्रभागनिहाय उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित केले जाणार आहेत.
स्थानिक काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर घेतलेल्या या निर्णयामुळे येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी एक सक्षम आणि पर्यायी शक्ती म्हणून जनतेसमोर उभी राहील.
या घडामोडींमुळे बदलापूरच्या राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, सर्वांच्या नजरा आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या घोषणेकडे लागल्या आहेत.























