अंबरनाथ :-अंबरनाथ नगरपालिकेमार्फत जाहीर करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत शहरातील अनेक प्रभागातील हजारो मतदार मूळ प्रभागा ऐवजी इतर प्रभागांमध्ये टाकण्यात आल्याचा आरोप होत आहे.अंतिम मतदार यादीमुळे अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येने एका वार्डातील नावे दुसऱ्या वार्डामध्ये टाकल्यामुळे शहरातील इच्छुक नगरसेवक आणि नागरिकांमध्ये संभ्रम व संताप निर्माण झाला आहे. या घोळाचा सर्वाधिक फटका हा शिवसेना आणि भाजपा, उमेदवारांना बसला असून उमेदवारांमध्ये खळबल उडाली आहे. त्यामुळे उमेदवारांनी वरिष्ठ नेते आणि आयोगाकडे अंतिम मतदारयाद्या सुधारण्यासाठी धाव घेतली आहे.
बोगस मतदारांच्या मुद्यावरून दोन दिवसांपूर्वी मुंबईत मनसे आणि मविआने मोर्चा काढला होता. त्यातच अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या अंतिम मतदारयादीत प्रारूप यादीनुसार आक्षेप घेतलेल्या चुका सुधारण्याऐवजी हजारो मतदार शिवसेना, भाजप उमेदवारांच्या प्रभागात नव्याने समाविष्ट करण्यात आल्याचे समोर आले आहे.
अंबरनाथ पूर्व, पश्चिम भागातील अनेक प्रभागात एक हजारांपासून ते जवळपास तीन हजारांपर्यंत मतदारांची नावे इतर प्रभागांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. तर भाजपच्या अनेक माजी नगरसेवक आणि उमेदवारांची नावेच इतर प्रभागांत गेली आहेत. त्यामुळे अंतिम मतदारयादी हातात पडल्यानंतर त्यातील हजारो मतदारांचा घोळ पाहून उमेदवारांना धक्का बसला आहे. त्यात प्रारूप यादीत प्रसिद्ध न झालेल्या अनेक याद्या चुकीच्या प्रभागांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप उमेदवार करत आहेत.























