बदलापूर :- काही माणसं पदामुळे मोठी होत नाहीत, तर माणुसकीमुळे लोकांच्या मनात अढळ स्थान मिळवतात. अजितदादा पवार हे त्याच मोजक्या नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी शब्दांत मांडता येणार नाही, पण बदलापूरसाठी ही हानी अधिक वैयक्तिक आहे… अधिक हळवी आहे.
दादांच्या निधनाची बातमी जशी बदलापूरमध्ये पोहोचली, तशी शहर क्षणभर थांबले. बेलवली परिसरात अनेक दुकाने कोणत्याही आवाहनाविना बंद झाली. कुठे घोषणा नव्हत्या, कुठे बॅनर न्हवते – फक्त शांतता होती… आणि त्या शांततेत दडलेलं दुःख होतं. “दादा नेहमी वेळेआधी पोहोचायचे, पण आयुष्यातून मात्र खूपच लवकर निघून गेले” हीच भावना प्रत्येकाच्या डोळ्यांतन वाहत होती.
राजकारणापलीकडचं नातं
अजितदादा आणि बदलापूर यांचं नातं केवळ विकासकामांच्या उद्घाटनापुरतं मर्यादित नव्हतं. ते नातं होतं आपुलकीचं, विश्वासाचं आणि शब्दाला जागण्याचं. बदलापूरमधील दामले कुटुंबीयांशी दादांचे संबंध हे त्याचं जिवंत उदाहरण होते. दादांवरील प्रेमापोटी आशिष दामले यांनी उभारलेले दादा जिम, दादा क्लिनिक आणि अजितदादा पवार समर्पित साहित्य गौरव ग्रंथालय हे उपक्रम म्हणजे केवळ इमारती नव्हेत, तर दादांच्या विचारांची, त्यांच्या माणुसकीची आठवण जपणारी ठिकाणं आहेत.
संकटात दिसणारा खरा नेता
२००५ चा तो भयावह पूर… बदलापूरच्या बॅरेज धरणाचे झालेले प्रचंड हृय्द्धह्नट्ट% आणि त्या गोंधळातही अजितदादांनी दाखवलेली तातडी. कागदपत्रांच्या फेऱ्यात अडकून न राहता त्यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून मदतीचा हात दिला. तेव्हाच बदलापूरकरांना उमगलं… हा नेता केवळ भाषण करणारा नाही, तर संकटात उभा राहणारा आहे.
संवेदनशीलतेची जाणीव
राजकारणात कठोर म्हणून ओळख असलेले अजितदादा आतून मात्र अत्यंत संवेदनशील होते. बदलापूरमध्ये एका चिमुकलीसोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष प्रियांका दामले यांनी जेव्हा ही बाब दादांच्या निदर्शनास आणली, तेव्हा क्षणाचाही विलंब न करता त्यांनी शिक्षण विभागाला आदेश दिले. पूर्व-प्राथमिक वर्ग शासनाच्या कक्षेत आणण्याचा निर्णय म्हणजे त्या संवेदनशीलतेचं ठळक उदाहरण होतं.
“काम झालंच पाहिजे” हीच ओळख
हातात घेतलेलं काम अर्ध्यावर सोडणं अजितदादांच्या स्वभावात नव्हतं. वेग, निर्णयक्षमता आणि परिणामकारक अंमलबजावणीमुळे… या त्रिसूत्रीमुळेच ते अनेकांसाठी ‘दादा’ झाले. पद असो वा नसो, त्यांचा शब्द म्हणजे शब्द होता.
आज अजितदादा आपल्यात नाहीत. पण बदलापूरच्या प्रत्येक विकासकामात, मदतीच्या प्रत्येक आठवणीत, आणि असंख्य सामान्य माणसांच्या हृदयात ते कायम जिवंत राहतील. बदलापूर आणि अजितदादा यांचं हे नातं कधीच संपणार नाही ते फक्त आठवणींच्या रूपाने अधिक घट्ट झालं आहे. आदर्श बदलापूर तर्फे महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉवरहाऊस शांत झाले. दादा, तुमच्यासारखा स्पष्टवक्ता आणि प्रशासनावर पकड असलेला नेता पुन्हा होणे नाही. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!






















