Historic Win At Edgbaston
ज्या मैदानात आतापर्यंत भारतीय संघाने एकही विजय मिळाला नव्हता त्या बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात भारतीय संघाने आज ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पहिल्या दिवसापासून वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघाने आज ऐतिहासिक विजय मिळवत इंग्लंड संघाचा तब्बल ३३६ धावांनी इंग्लंडला पराभूत करत परदेशातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. एवढेच नाही भारतीय संघ एजॅबेस्टनच्या मैदानात कसोटी जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे.
या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं फलंदाजीत धमक दाखवत ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. विक्रमी धावसंख्या उभारत खेळलेला हा डाव बॅझबॉल खेळणाऱ्या इंग्लंड संघाच्या मानसिकतेवर मोठा घाव होता. टीम इंडियाने मालिकेत आघाडीवर असलेल्या यजमान इंग्लंड संघाला आक्रमक खेळून धावा काढा, नाहीतर बचावात्मक खेळण्याचं तंत्र दाखवून मॅच ड्रॉ करून दाखवा, असं चॅलेंजच दिले होते.
अखेर पहिला विजय मिळाला
एजबॅस्टनच्या मैदानात भारतीय संघाने १९६७ ते २०२२ या कालावधीत ८ कसोटी सामने खेळले होते. यात १९८६ मध्ये एक सामना अनिर्णित राहाल होता. याशिवाय ७ सामन्यात भारतीय संघाच्या पदरी पराभव पदरी पडल्याचे पाहायला मिळाले, अखेर शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनच्या मैदानात विजयी पताका फडकावली आहे. शुबमन गिलसाठीही हा क्षण खास आहे. कारण त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा पहिला विजय आहे.
टीम इंडियानं सेट केलं होत विक्रमी लक्ष्य
बर्मिंगहॅमच्या मैदानात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूनं लागला होता. पहिल्या कसोटी सामन्याप्र्माणे इथंही इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात शुबमन गिलचं विक्रमी द्विशतक आणि यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ५८७ धावा केल्या. सिराज आणि आकाश दीप यांनी दोघांनी मिळून १० विकेट्स घेत इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकच्या शतकी खेळीशिवाय जेमी स्मिथनं नाबाद १८४ धावांची खेळी केली. पहिल्या डावात १८० धावांची आघाडी घेतल्यावर भारतीय संघानं दुसरा डाव ६ बाद ४२७ धावांवर घोषित करत इंग्लंडच्या संघासमोर ६०८ धावांचे टार्गेट सेट केले होते. दुसऱ्या डावात शुबमन गिलच्या शतकासह केएल राहुल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या भात्यातून अर्धशतक पाहायला मिळाले.























