बदलापूर : बारवी धरण परिसरात संततधार पाऊस होत असून धरणातील पाण्याची पातळी वाढत आहे. शनिवारी (दि.२६) सकाळी धरणातील पाणीपातळी ही ७०.९२ मीटर झाली आहे. बारवी धरणाची उंची ही ७२.६० मीटर आहे. पावसाचा जोर पाहता धरण लवकरच भरण्याची शक्यता असून धरणावरील स्वयंचलित दरवाजे उघडले जातील. यामुळे चारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पात्रात उतरण्यास पर्यटकांना बंदीची सूचना तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावर कराव्यात, असे पत्रदेखील एमआयडीसीने तहसीलदारांना पाठविले आहे.
एमआयडीसीच्या बारवी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. बारवी धरण, तसेच धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी धरणातील पाणीपातळी ही ७०.९२ मीटर एवढी असून बारवी धरणाच्या जलग्रहन क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. बारवी धरणाची उंची ७२.६० मी असून पावसाचे प्रमाण वाढत असल्याने धरणात येणारा पाण्याचा स्रोत वाढला आहे. त्यामुळे बारवी धरणाची पातळी वाढून बारवी धरणाचे स्वयंचलित वक्रद्वारे (गेट) येणाऱ्या काही दिवसांत उघडण्याची शक्यता आहे. परिणामस्वरूप बारवी धरणातून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होईल. त्यामुळे चारवी नदीकाठच्या विशेषतः आस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली , सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोऱ्याचापाडा. चोण. रहाटोली व नदीकाठावरील इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा तसेच गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांनी गांवातील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असलेबाबत सतर्कतेच्या सूचना देण्याची विनंती आहे. तसेच या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिकांना व पर्यटकांना प्रवेश न देणेबाबत तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करणेबाबत सूचना आपले स्तरावरुन देण्यात याव्यात,अशा सूचना देण्याची विनंती एमआयडीसीने केली आहे.
विसर्ग काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिक व पर्यटकांना प्रवेश देऊ नये, तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करण्याबाबत सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, अशी विनंती अंबरनाथ एमआयडीसी बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईक यांनी कल्याण अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड तहसीलदारांना पत्र पाठवून केली आहे.
॥























