बदलापूर : बदलापूर येथे ऑगस्ट २०२४ मध्ये एका शाळेत घडलेल्या अनुचित घटनेनंतर राज्य सरकारने संवेदनशील निर्णय घेत पीडित दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. या दोन्ही मुलींच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी त्यांच्या इयत्ता दहावीपर्यंतच्या प्रवेश शुल्काचा संपूर्ण खर्च शासनामार्फत अदा करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला असून ही मान्यता “एक वेळची विशेष बाब” म्हणून देण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार, निर्भया क्र. १ हिचे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे तसेच निर्भया क्र. २ हिचे प्रलंबित सिनिअर के. जी. आणि इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शैक्षणिक वर्षांचे प्रवेश शुल्क शासनाकडून भरले जाणार आहे. हा खर्च ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९’ अंतर्गत करण्यात येणार असून संबंधित शाळांना विहित रकमेप्रमाणे शुल्क अदा केले जाईल.
दरम्यान, या निर्णयामुळे पीडित मुलींना शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संबंधित कार्यवाही जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून, राज्य सरकारच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत केले जात आहे.























