बदलापूर:- एप्रिल महिन्याच्या अखेरीस राज्यभरासह बदलापूर शहरातही उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुळगाव बदलापूर नगर परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेत दुपारी १.३० ते ४.३० या वेळेत शहरातील सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सिग्नलवर काही मिनिटे थांबावे लागल्याने दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि प्रवाशांना कडाक्याच्या उन्हात मोठा त्रास सहन करावा लागत होता. काँक्रीटच्या रस्त्यांमुळे उष्णता अधिक वाढून काही वाहनचालकांना चक्कर येण्याच्या घटनाही वाढल्या होत्या.
खासगी हवामान अभ्यासकांच्या मते, बदलापूर आणि परिसरात तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात असून कोकण पट्ट्यातील आर्द्रतेमुळे जाणवणारी उष्णता आणखी वाढत आहे. विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक असते.
यापूर्वी शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रमुख चौकांचे रुंदीकरण करून सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली होती. मात्र सध्याच्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सिग्नल यंत्रणेमुळे होणारा त्रास लक्षात घेऊन हा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे.
नगर परिषदेच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत असून विशेषतः कामानिमित्त बाहेर पडणारे कर्मचारी आणि रिक्षाचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, सिग्नल यंत्रणा बंद असताना वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आरोग्य विभागानेही नागरिकांना दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे आणि उष्माघातापासून बचाव करण्याच्या सूचना दिल्या आहेत.























