ठाणे :- जिल्ह्यातील मतदार याद्यांचेविशेष सखोल पुननिरीक्षण मोहिमेअंतर्गत (एसआयआर) मतदार नोंदणी आणि पडताळणीचे काम सुरू असताना ठाणे जिल्ह्यात एकूण मॅपिंग (मतदारांची महिती जुळवणे) केवळ ४५.४७ टक्क्यांवर पोहोचल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील एकूण ७५ लाख ३ हजार ४२१ मतदारांपैकी ३४ लाख ११ हजार ८१३ मतदारांचेच आतापर्यंत मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित मतदारांची प्रक्रिया अजून प्रलंबित आहे. त्यामुळे प्रशासनासमोर वेग वाढवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरात राबविण्यात येणारी एसआयआर मोहीम ही मतदार याद्या शुद्ध, अद्ययावत आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी राबविण्यात येत आहे. वाढती शहरीकरण, स्थलांतर, मृत्यू आणि नव्याने पात्र होणारे मतदार या सर्व घटकांमुळे मतदार यादीत सतत बदल होत असतात. त्यामुळेच या सर्व बदलांची अचूक नोंद घेण्यासाठी ही मोहीम अत्यावश्यक ठरते आहे.
ठाणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यात जिल्हा निवडणूक विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र यामध्ये प्रामुख्याने शहरी भागात नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असून शहापूर सारख्या ग्रामीण भागात मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. तर उर्वरित नागरिकांचे मॅपिंग देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असल्याची प्रतिक्रिया जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत “मॅपिंग” ही मुख्य प्रक्रिया असते. मॅपिंग म्हणजे मतदार यादीतील प्रत्येक नावाची प्रत्यक्ष पडताळणी करून त्या व्यक्तीचे वास्तव अस्तित्व, सध्याचा पत्ता आणि ओळख निश्चित करणे. निवडणूक आयोगाचे अधिकारी, कर्मचारी तसेच बीएलओ घराघरांत जाऊन मतदारांची माहिती तपासतात. यामध्ये संबंधित मतदार त्या पत्त्यावर वास्तव्यास आहे का, त्याचे नाव योग्य आहे का, त्याची नोंद दुबार तर नाही ना, किंवा तो मतदार मृत अथवा स्थलांतरित झाला आहे का, याची सखोल छाननी केली जाते. याच प्रक्रियेत नवीन पात्र मतदारांची नोंदणी, मृत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, तसेच मतदारांच्या तपशीलांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करणे ही कामेही केली जात आहेत. एकूणच पाहता जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघ ५० टक्क्यांच्या खालीच असल्याने एसआयआर मोहिमेचा वेग वाढवणे आवश्यक झाले आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मॅपिंग
भिवंडी ग्रामीण
६२.३३%
शहापूर
-७५.१८%
भिवंडी पश्चिम
-५२.६३%
भिवंडी पूर्व
-४९.६९%
कल्याण पश्चिम
३७.६६%
मुरबाड
५३.३९%
अंबरनाथ
-४३.८०%
उल्हासनगर
-५३.५२%
कल्याण पूर्व
४६.९७%
डोंबिवली
४०.३९%
कल्याण ग्रामीण
३१.२२%
मीरा-भाईंदर
३८.५५%
ओवळा-माजिवाडा
३७.६७%
कोपरी-पाचपाखाडी
६१.१४%
ठाणे
४६.८०%
मुंब्रा-कलवा
४२.४६%
ऐरोली
३२.१७%
बेलापूर
४२.००%























