बदलापूर : उल्हास नदीत अनधिकृत भरावा प्रकरणी सत्संग विहार या धार्मिक संस्थेवर महसूल विभागामार्फत अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी महसूल विभागाने संस्थेस दहा कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता मात्र, अद्याप दंड न भरल्याने व भराव न काढल्याने फौजदारी कारवाई या संस्थेवर करण्यात आली आहे.
बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा येथून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या काठावरील कित्येक एकर जागेत, सत्संग विहार ही धार्मिक संस्था कार्यरत आहे. आपल्या जागेच्या सुरक्षेसाठी या संस्थेने चक्क उल्हास नदीत अनधिकृत मातीचा भराव टाकून, या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचा प्रयत्न सुरू केला होता. जर हा भराव टाकून संस्थेने हे काम केले असते तर, आजूबाजूच्या परिसरातच नव्हे तर संपूर्ण हेंद्रेपाड्यात पुराची परिस्थिती निर्माण झाली असती. मात्र यावेळी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क होऊन, अनेक सामाजिक संघटना, समाजसेविका संगीता चेंदवणकर, अविनाश सोनवणे, यांच्या पुढाकारातून हा भराव हटवण्यासाठी मोठे जनआंदोलन उभे केले. व पर्यावरण संवर्धन योद्धा म्हणून ओळखले जाणारे डी स्टॅलिन यांना या आंदोलनात सहभागी करुन घेतले. यावेळी आंदोलनाची दखल घेत महसूल विभागाने स्थळ पाहणी करीत, उल्हासनदी पात्रात अनधिकृत रित्या केलेला ८९१२ ब्रास माती, १९६ ब्रास दगड, व ८३ ब्रास दगड पावडर या गौणखनिजाचा भरावाचा दंड रक्कम रु. ९,९३,६७,१४१/- व सदर भरावासाठी वापरण्यात आलेली यंत्र समुग्रीचा जातमुचलका रक्कम रु. २२,५०,०००/- असा एकूण रक्कम रु. १०,१६,१७,१४१/- दंडाचे आदेश संबंधित संस्थेला दिले. व हा भराव २५ मे २०२५ पर्यंत काढून नदीपात्र पुर्ववत करणेबाबत सूचना केल्या. परंतु संस्थेने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. ना भराव काढला ना दंड भरला त्यामुळे अखेर तहसीलदार अमित पुरी यांच्या आदेशानंतर महसूल विभागाने, या सत्संग विहार संस्थेवर गुन्हा दाखल केला आहे.
बदलापूर मंडल अधिकारी यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांना सत्संग संस्थेने उल्हास नदी पात्रात केलेला अनधिकृत भराव काढून सत्संग संस्थेच्या जागेत टाकावा व उल्हास नदीपात्र पुर्ववत करावे, असे पत्र दिले आहे. सदर कामी येणा-या खर्चाचे देयक सत्संग या संस्थेकडे देऊन देयकाची रक्कम सदर संस्थेकडून वसूल करावी. असे आदेश दिले आहेत.
यावेळी जन आंदोलनाची दखल घेऊन महसूल विभागाने केलेल्या या कारवाईमुळे सर्व निसर्गप्रेमी जनतेने स्वागत केले आहे.























