बदलापूर :- कुळगाव बदलापूर नगरपरिषद शाळांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून नगरपालिका शिक्षण व्यवस्थेचा दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावी परीक्षेच्या निकालात नगरपरिषदेच्या चार शाळांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. विशेष म्हणजे काही शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
नगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी हे श्रमिक, शेतकरी, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. अशा परिस्थितीतही या विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर यशाची उंच भरारी घेतली आहे. हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.
गेल्या दशकभरात नगरपालिकाशाळांच्या गुणवत्तेमध्ये झालेली वाढ ही विशेष लक्षवेधी आहे. पूर्वी केवळ गरजू विद्यार्थ्यांची निवड असलेल्या या शाळांकडे आता सधन कुटुंबातील पालकही विश्वासाने पाहू लागले आहेत. आधुनिक सुविधा, डिजिटल शिक्षण, सक्षम शिक्षकवर्ग आणि प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे नगरपालिका शाळांची प्रतिमा उंचावत आहे.
या यशामागे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शालेय व्यवस्थापन समित्या तसेच नगरपालिका प्रशासन यांचे मोठे योगदान आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, शिक्षण सभापती,लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने शिक्षणाच्या विकासासाठी सातत्याने दिलेले सहकार्य मोलाचे ठरले आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही वेळोवेळी निधी उपलब्ध करून शाळांच्या गुणवत्तावाढीस हातभार लावला आहे.
PM SHRI डिजीटल शाळा क्रमांक १, कुळगाव आदर्श उर्दू शाळा आणि एरंजाड माध्यमिक शाळेने शंभरटक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच शिक्षकांची अथक मेहनत आणि शैक्षणिक बांधिलकी यामुळे हे यश शक्य झाले. बेलवली शाळेनेही मर्यादित साधनसामग्रीत चांगली कामगिरी नोंदवली आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात नगरपालिका शाळांनी सिद्ध केले आहे की, गुणवत्तापूर्ण शिक्षण हे केवळ मोठ्या खासगी संस्थांचे मक्तेदारी राहिलेले नाही. योग्य नियोजन, शिक्षकांची निष्ठा आणि प्रशासनाची इच्छाशक्ती असेल तर सर्वसामान्य विद्यार्थदिखील उल्लेखनीय यश संपादन करू शकतात.
कुळगाव बदलापूरनगरपरिषद शाळांचा हा निकाल केवळ टक्केवारीचा आकडा नसून सामाजिक परिवर्तनाची नांदी आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण होत आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे शिक्षण मंडळ सभापती तथा उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांनी अभिनंदन केले आहे.























