बदलापूर : आगामी जनगणनेचा महत्त्वाचा भाग असलेल्या “गृहगणना २०२७” या राष्ट्रीय कामाकडे दुर्लक्ष करून शासकीय आदेशाचा अवमान करणाऱ्या पाच प्रगणकांविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पर्यवेक्षकांनी १६ मे रोजी अधिकृत तक्रार दाखल केली. या कारवाईमुळे नियुक्त प्रगणकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जनगणना २०२७ अंतर्गत घरसुची आणि गृहगणनेचे काम करण्यासाठी नगरपालिकेकडून विविध शाळा व कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे व्ही. एस. सांबळे व बी. जी. जाधव, हेवन बेल कॉन्व्हेंट स्कूलच्या दिपावली दामोदरे, गुरुकुल इंग्रजी माध्यम शाळेच्या अर्चना मराडे आणि एस.डी.एम. इंग्लिश हायस्कूलच्या पुजा चव्हाण यांचा समावेश होता. आदेशानुसार १३ मे २०२६ पासून संबंधित गटांमध्ये काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, हे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत तसेच त्यांनी नियुक्त कामाला सुरुवातही केली नाही.
नगरपरिषदेचे पर्यवेक्षक दादाराव सावंत, विजय कदम आणि विजय रताळे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेकांनी फोन उचलणे टाळले किंवा सहकार्य करण्यास नकार दिला. अर्चना मराडे यांनी “तुम्हाला काय करायचे ते करा” असे उत्तर देत फोन बंद केल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. तर बी. जी. जाधव यांनी आपण सुट्टीवर साताऱ्यात असल्याचे सांगितले. या बेजबाबदार भूमिकेमुळे राष्ट्रीय महत्त्वाच्या जनगणना कामात अडथळा निर्माण झाल्याने मुख्याधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत संबंधित पाचही प्रगणकांविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.























