बदलापूर:- उल्हास नदी सध्या वाढत्या प्रदूषणामुळे गंभीर संकटात सापडली असून, बदलापूर परिसरातील परिस्थिती विशेषतः चिंताजनक बनली आहे. लाखो नागरिकांच्या पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी असलेल्या या नदीच्या संरक्षणासाठी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नगर परिषदेच्या नव्या कृती आराखड्यानुसार, हाय-डेफिनिशन आणि थर्मल कॅमेऱ्यांनी सज्ज ड्रोनद्वारे नदीपात्र आणि आसपासच्या भागाचे नियमित सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या माध्यमातून बेकायदा नाले, थेट नदीत सोडले जाणारे सांडपाणी, तसेच औद्योगिक रासायनिक प्रवाहांचे अचूक स्रोत शोधणे शक्य होणार आहे. याशिवाय जलपर्णी, घनकचरा, अतिक्रमण आणि पाण्याच्या प्रवाहातील अडथळे यांचीही ओळख पटवून तातडीने उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) नसल्यामुळे घरगुती सांडपाणी मोठ्या प्रमाणात नाल्यांमार्फत थेट नदीत मिसळत आहे. तसेच एमआयडीसी परिसरातील काही उद्योगांकडून रासायनिक सांडपाणी योग्य प्रक्रिया न करता सोडले जात असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. यामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता खालावत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
लोणावळा परिसरातून उगम पावणारी ही नदी कर्जत, बदलापूर, अंबरनाथ मार्गे पुढे कल्याण खाडीला मिळते. मात्र प्रवासादरम्यान वाढते शहरीकरण, शेतीमधील रासायनिक वापर, प्लॅस्टिक व घनकचरा यामुळे प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे.
पर्यावरणप्रेमींनी ड्रोन सर्वेक्षणाच्या निर्णयाचे स्वागत केले असले तरी केवळ निरीक्षण न करता दोषींवर कठोर कारवाई करणे, औद्योगिक सांडपाण्यावर नियंत्रण ठेवणे आणि तातडीने एसटीपी उभारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. उल्हास नदीचे पुनरुज्जीवन हे आता प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीसह ठोस राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून असल्याचे स्पष्ट होत आहे.























