बदलापूर : दिवाळीची ऊब ओसरताच बदलापूर शहरात थंडीने जोरदार उपस्थिती लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराचे तापमान लक्षणीयरीत्या घटले असून, सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास ते १५ ते १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.
पहाटेच्या वेळचा गारठा वाढत असून शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, सकाळी फिरायला जाणारे नागरिक यांना या थंडीचा तीव्र अनुभव येत आहे. अनेक घरांतून स्वेटर, चादरी आणि घोंगड्या पुन्हा बाहेर काढल्या जात आहेत. पहाटे हवेत जाणवणारा धुरकटपणा आणि दवबिंदू त्यामुळे थंडी अधिक स्पष्ट जाणवत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांच्या माहितीनुसार, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कोकण पट्ट्यात पोहोचत असल्याने तापमानात घट झाली आहे. पुढील आठवडाभर हे थंड वातावरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आठवड्यानंतर दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम म्हणून तापमानात काही प्रमाणात वाढ आणि आर्द्रतेत बदल जाणवू शकतो.
आरोग्य तज्ज्ञांचा इशारा
थंडीची सुरुवात असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा व सर्दी-खोकल्याची समस्या असलेल्या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळ घराबाहेर पडताना उबदार कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.























