बदलापूर : लाल किल्ल्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण स्फोटानंतर संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. त्याचा परिणाम ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, भिवंडी परिसरातही जाणवत आहे. ठाणे पोलीस आणि रेल्वे पोलीसांनी तात्काळ सतर्कता वाढवून तपासणी मोहीम सुरू केली आहे.
रेल्वे स्थानकांवर गर्दी होत असल्यामुळे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच ठाणे, दिवा, डोंबिवली,कल्याण, बदलापूर या स्थानकांवर RPF व GRP यांची संख्या वाढवण्यात आली असून श्वान पथकांच्या मदतीने संशयित बॅगा वस्तू आणि वाहनांची तपासणी सुरू आहे.
ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्रीपासूनच महत्त्वाच्या रस्त्यांवर रस्त्यांवर नाकाबंदी सुरू केली आहे. तसेच प्रमुख ठिकाणी पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे.मॉल, बाजारपेठ, वाहनतळ या ठिकाणी कडे कोट बंदोबस्त करून संशहितांची तपासणी सुरू आहे. हॉटेलमध्ये राहायला आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
सोशल मीडियावरही लक्ष
अफवा पसरू नयेत म्हणून पोलिसांनी सोशल मीडियावरही नजर ठेवली आहे.दिशाभूल करणारे पोस्ट्स टाकणाऱ्यांवर कारवाईची चेतावणी.
नागरिकांना आवाहन
सहायुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले – ठाणे आयुक्तालय क्षेत्रात अद्याप कोणतीही संशयास्पद हालचाल आढळलेली नाही, तरीही सर्व पथके सतर्क आहेत. नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती, वस्तू किंवा वाहन दिसल्यास तात्काळ 112 वर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.























