अंबरनाथ : शहरातील प्रमुख रस्त्यांवर गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या स्वागत कमानींचे सांगाडे अजूनही तस्सेच उभे असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. गणेशोत्सव उलटून गेलेला असला तरी या सांगाड्यांची विल्हेवाट न लागल्याने हे सांगाडे नवरात्रोत्सवाची वाट पाहत आहेत का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
गणेशोत्सवानिमित्त शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक मंडळांनी स्वागत कमानी उभारून बॅनरबाजी केली होती. मात्र उत्सव संपूनही कमानी सांगाडे काढण्याचे विसरले आहेत. विशेष म्हणजे, हे कमानी रस्त्यांच्या मध्यभागी आडवे येत असल्याने दैनंदिन वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत.
कल्याण–बदलापूर राज्य महामार्गावर उभारलेल्या काही कमानींच्या सांगाड्यांनी सर्वसामान्य वाहनधारकांचे हाल सुरू केले आहेत. महात्मा गांधी शाळेसमोरच्या सिग्नलवर तर परिस्थिती गंभीर असून, येथे उभारलेल्या कमानीच्या सांगाड्याची एक बाजू थेट रस्त्यात येत आहे. त्यामुळे बदलापूरकडून येणारी वाहने सिग्नलवर थांबल्यास स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यास मार्ग राहत नाही.
यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अडथळे अधिकच वाढत आहेत. एखादी रुग्णवाहिका आल्यास तिला मार्ग देण्यासाठी इतर वाहनांना नाईलाजाने सिग्नल तोडावा लागतो. परिणामी, वाहतूक कोंडी तर होतेच, पण नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत वाहनचालक व्यक्त करत आहेत. सणासुदीच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी उत्सवानंतर वेळेत काढून टाकणे आवश्यक असतानाच, त्यांच्यामुळेच आता वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे.






















