बदलापूर : येथील नगरपरिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात आता खिचडीसोबत खजूर, केळी आणि राजगिरा लाडूही मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी उपनगराध्यक्ष प्रियांका दामले यांनी नगर परिषद शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांसोबत खिचडीचा आस्वाद घेत पोषण आहाराची गुणवत्ता तपासली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कुळगांव नगरपरिषदेच्या १६ प्राथमिक शाळा असून इयत्ता पहिली ते आठवीची एकूण विद्यार्थी पटसंख्या ३४४९ इतकी आहे. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून विद्यार्थी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शाळेत असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षापासून पोषण पुरक आहारामध्ये आठवड्यातून किमान तीन दिवस केळी, खजूर व राजगीरा लाडू दिला जाणार आहे. एक दिवस केळी एक दिवसखजूर व एक दिवस राजगारा लाडू अशाप्रकारे हा पोषण पूरक आहार दिला जाणार आहे. पोषण पुरक आहारातून विद्यार्थ्यांना आरोग्यास आवश्यक असणारी जीवनसत्वे खनिजे प्राप्त होऊन त्यांची बौद्धिक व शारीरिक वाढ योग्य प्रकारे व्हावी, असा या उपक्रमांचा उद्देश असून त्यासाठी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उपनगराध्यक्ष प्रियांका दामले यांनी नगरपरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे पोषण आहार मिळतो आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी अचानक नगर परिषद शाळांना भेटी देऊन पाहणी केली होती. विद्यार्थ्यांना दिल्या जात असलल्या पाषण आहाराचा गुणवत्ता तपासण्यास त्यांनी स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून त्यांना देण्यात येत असलेल्या खिचडीचा आस्वाद घेतला होता. तसेच विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवादही साधला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना पोषण आहारात फळे व इतर पौष्टिक पदार्थ देण्याचे आवश्यक असल्याचे त्यांच्या निदर्शनास त्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. दरम्यान, कुळगाव बदलापूर नगरपरिषद प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅ. आशिष दामले यांनी स्वागत केले असून नगराध्यक्ष रुचिता घोरपडे व उपनगराध्यक्ष प्रियांका दामले यांचे आभार मानले.























