बदलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूरकरांना वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी महावितरण विरोधात मोर्चा व निवेदनाच्या माध्यमातून शहरातील वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अशी मागणी केलेली आहे. परंतु यामध्ये कोणतीही सुधारणा न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी थेट अप्पर मुख्य सचिव यांना फोन करत शहरातील वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अशी मागणी केली आहे.
काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शहरातील नागरिक हैराण असून त्याचा फटका शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेलाही बसला आहे. याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत प्रश्नांची सरबत्ती केली असता, येत्या तीन दिवसात जल शुद्धीकरण केंद्राला होणाऱ्या विजेचा प्रश्न निकाली काढण्यात येईल तसेच पूर्वेतील वीज समस्येवरही आठव़डाभरात दिलासा मिळेल, असे आश्वासन यावेळी महावितरणाचे कार्यकारी अभियंते आनंद काटकर यांनी शिवसेनेच्या शिष्ट मंडळाला दिले होते. परंतु हे आश्वासन हवेत विरले. वीज समस्येबाबत कोणतीही सुधारणा न झाल्याने अखेर परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी थेट ऊर्जा विभागाच्या अप्पर सचिव आभा सिंग यांना फोन करत शहरातील वीज समस्येबाबत माहिती दिली. महावितरणातील निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे ही परिस्थिती उद्भवत असल्याने आपण या गोष्टीत लक्ष घालावे अशी विनंती केली. दामले यांनी केलेल्या विनंतीनुसार ऊर्जा अप्पर सचिवाने देखील सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर शहरातील समस्या सोडवण्याचे आश्वासन दामले यांना दिले आहे. त्यामुळे लवकरच बदलापूरकरांना वीज समस्येतून सुटका मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.























