बदलापूर :-कुळगांव-बदलापूर नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या रूचिता घोरपडे यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या विजयाचे शिल्पकार आमदार किसन कथोरे असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीमुळेच निवडणुकीचे गणित पालटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
यापूर्वीच्या नगर परिषद निवडणुकांत भाजपला निसटता पराभव स्वीकारावा लागत होता. मागील निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात अवघ्या चार जागांचा फरक होता. त्या वेळी स्थानिक आमदारांनी प्रचारात पुरेसे लक्ष दिले नाही, अशी टीकाही होत होती. मात्र यंदाची निवडणूक आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून कथोरेसक्रिय राहिले, पायी यात्रा, रॅली, सभा आणि बैठकींच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. या काळात शिवसेनेचा निवडणुकीतील चेहरा मानले जाणारे वामन म्हात्रे यांच्यावर त्यांनी सातत्याने टीका केली.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच कथोरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बंटी म्हस्कर यांना भाजपात प्रवेश दिला होता. यामुळे युतीत मतभेद निर्माण झाले. वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतरही शिवसेनेतील अनेक पदाधिकारी भाजपसाठी सक्रियपणे काम करत नसल्याची चर्चा होती. त्यामुळेच नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करण्याचा निर्धार कथोरे यांनी केल्याचे बोलले जाते.
दरम्यान, निवडणुकीपूर्वीआमदार कथोरे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अचानक युती जाहीर केली. मंत्री आशिष दामले यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसला उपनगराध्यक्ष पद देण्याची तयारी दर्शवण्यात आली तसेचमंत्री आशिष दामले यांचा कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात मोठा प्रभाव असल्याने नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवलेल्या आठ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना १८००० पेक्षा जास्त मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा फायदा थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारास झाल्याचे सांगितले जाते.यामुळेच भाजपच्या विजयाचे आणि शिवसेनेच्या पराभवाचे समीकरण बदलल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
कुळगांव-बदलापूर युतीने सर्वाधिक २५ जागा जिंकल्यानंतर आमदार कथोरे यांनी पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशाराही दिला. हा पराभव शिवसेनेचा नसून ‘वडवलीचा’ असल्याची टिप्पणी करत त्यांनी पुन्हा म्हात्रे कुटुंबावर टीका केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आमदार कथोरे आणि म्हात्रे यांच्यातील हा राजकीय संघर्ष आगामी काळातही सुरूच राहणार, अशी चर्चा
बदलापुरच्या राजकारणात साली आहे























