इतिहास अभ्यासक कौस्तुक कस्तुरेंचे व्याख्यान संपन्न,प्रेक्षक भारावले
बदलापूरः छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तीन टप्प्यात १३ दिवसात संपन्न झाला. त्यासाठी विविध विधी करण्यात आले. राज्याभिषेक त्याकाळी अत्यंत महत्वाचा होता. त्यानंतर त्याचे दूरगामी परिणाम झाले, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक आणि व्याख्याते कौस्तुभ कस्तुरे यांनी केले. प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि संवेग फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत शिवराज्याभिषेकाची गाथा या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी संवेग फाऊंडेशनचे श्रीधर पाटील आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा वृत्तांत ऐकून उपस्थित श्रोते भारावले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा शुक्रवारी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपन्न झाला. त्यानिमित्त प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि संवेग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेकाची गाथा या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. यावेळी शिवछत्रपतींनी लिहलेल्या मुळ पत्रांचेही प्रदर्शन मांडले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला माजी उपनगराध्यक्ष आणि संवेग फाऊंडेशनचे सर्वेसर्वा श्रीधर पाटील यांच्या पाटील बॅन्वेट सभागृहात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले. सुप्रसिद्ध चित्रकार सचिन जुवाटकर यांनी हे चित्र रेखाटले आहे. त्यानंतर कौस्तुभ कस्तुरे यांनी राज्याभेषिकाच्या १३ दिवसांच्या सोहळ्याचा वृत्तांत उपस्थित श्रोतांसमोर सांगितला.
शिवराज्याभिषेकाचा सोहळा सभासदांसह त्यावेळी उपस्थित असलेल्या अनेक जणांनी याबाबत लिहून ठेवल्याची माहिती यावेळी कौस्तुभ कस्तुरे यांनी दिली. त्या नोंदी परदेशी व्यक्तींनीही केल्या होत्या. शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा विविध विधी आणि कार्यक्रमांनी भरलेला होता. तीन टप्प्यात हा सोहळा पूर्ण झाला. राज्याभिषेक, राज्यारोहण आणि राज्यदर्शन असे तीन सोहळे त्यात होते. मुख्य सोहळ्याच्या दहा दिवस आधी विधी सुरू झाले होते. पहिल्या दिवशी महाराजांची मुंज झाली मग नियोजीत धार्मिक पद्धतीने राणी सोयराबाई यांच्याशी विवाह, त्यानतंर महाराजांची विविध प्रकारची तुला झाली. इंद्री शांती, विष्णू याग असे विधीही झाले. राज्याभिषेकाच्या दिवशी देशभरातील नद्यांतून आणलेल्या पाण्याने, तेलाने स्नान अशा अनेक गोष्टी त्यावेळी होत्या, असे कौस्तुभ कस्तुरे यांनी सांगितले.
राज्याभिषेकाच्या दिवशी गडावरील वातावरण वेगळेच होते. शिवाजी महाराज्यांचे भोवती सोन्याचा कळस, मोहरा असलेले कळस, छत्र घेऊन, ध्वज घेऊन अनेक जण महाराजांच्या भोवती उभे होते. महाराजांच्या हातात धनुष्य, एका हातात मुर्ती होती. उपस्थितांच्या हाती विविध गोष्टी होत्या. कुणी लाह्या, कुणी फुले उधळत होते. उपस्थित कुणी नाचत होते, कुणी जयघोष करत होते, कुणी नाचत होते, असे सांगत कस्तुरे यांनी राज्याभिषेकाचा क्षण श्रोत्यांपुढे उभा केला. सिंहासनावर बसल्यानंतर महाराजांची सुरूवातीला घोडा आणि नंतर हत्तीवरून रायगडावर मिरवणुक काढण्यात आली. हा राज्यदर्शन सोहळा होत असताना कवी भुषण यांनी त्यावर काव्यही केले, त्यातून या सोहळ्याची महती कळते, असे कस्तुरे म्हणाले.
राज्याभिषेक सोहळा महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्वीजय केला. त्यानंतर दक्षिणेत मराठा साम्राज्याचे वर्चस्व वाढले. राज्यांच्या कारभारात एक आदर्शपणा होता. आज्य जे फुकट वाटण्याचा प्रकार सुरू आहे तो शिवारायांच्या काळात नव्हता. शेतकऱ्याला शिवाजी महाराजांनी वेळोवेळी मदत केली. जनावरे नसतील तर जनावरे, शेतीसाठी हत्यारे, वेळप्रसंगी मजुरही देऊ केले. मात्र काही वर्षांनंतर त्याची भांडवली रक्कम सरकार दरबारी जमा करावी अशा महाराजांच्या सूचना होत्या. शेतकऱ्यांसह सर्वांनाच पायावर उभे करण्याचे बळ देण्याचा विचार महाराजांचा होता, असेही कस्तुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. महाराजांनी गोव्यातील धर्मांतर रोखले, पाद्रींनी वेळेप्रसंगी कठोर शिक्षा दिली. धर्मांतरण करणाऱ्या पाद्रींनाही धर्मांतराचा प्रस्ताव महाराजांनी दिला होता, त्याचे पुरावे आहेत असेही यावेळी कस्तुरे म्हणाले.
समष्ठीसाठी प्रयत्नाची गरज
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संवेग फाऊंडेशनचे प्रमुख श्रीधर पाटील यांनी आपल्या सर्वांना समष्टीसाठी प्रयत्नशील राहायला हवे असे आवाहन केले. आपल्या मुलांची वाढ कोणत्या वातावरणात होते हे महत्वाचे आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवे. आपल्या घराबाहेर, रस्त्यावर, चौकात सुरू असलेल्या चुकीच्या प्रकारांना विरोध करायला हवा. ही समष्ठी त्यांच्या भविष्यासाठी महत्वाची आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले. संवेग फाऊंडेशनच्या माध्यमातून यावेळी गुणवंत विद्यार्थांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रेस क्लब ऑफ बदलापुरचे सचिव संजय साळूंके, सदस्य, सचिन जुवाटकर, स्वप्ना पाटील यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या संकेत सबनीस यांनी केले.























