राज्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला. राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या १२ जिल्हा परिषदांसाठी पहिल्या टप्प्यात निवडणुका जाहीर करण्यात आल्या असून, त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका याच टप्प्यात होणार असून, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १६ ते २१ जानेवारी अशी असून, २२ जानेवारी रोजी अर्जांची छानणी केली जाईल. २७ जानेवारी ही उमेदवारी माघारीची अंतिम तारीख असून, याच दिवशी दुपारी ३.३० नंतर अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. या निवडणुकांमधून १२ जिल्हा परिषदांतील ७३१ सदस्य आणि १२५ पंचायत समित्यांतील १ हजार ४६२ सदस्य निवडून दिले जाणार आहेत.
मतदारांच्या सोयीसाठी मोबाईल अॅप आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मतदान केंद्र व मतदारसंघाची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर महिला आणि तान्ह्या बाळांसह आलेल्या महिलांना मतदानावेळी प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती आयोगाने दिली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून, निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.






















