बदलापूर :- कुळगाव बदलापूर नगर परिषदेची निवडणूक तोंडावर आली आहे. सुरुवातीपासूनच शिवसेना(शिंदे गट) व भाजपमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळालेला आहे. याच संघर्षात भाजपकडून उमेदवारी नकारल्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांना आपल्या बाजूला ओढण्यास शिवसेनेला यश आलं आहे. अर्ज भरण्याच्या दिवशी तीन भाजपाचे इच्छुकांना आपल्या बाजूला वळवण्यात शिवसेनेला यश मिळाले असून मंगळवारी भाजपाच्या जुन्या निष्ठावंतांना शिवसेनेत येऊन शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडायचं काम केलं आहे.
अर्ज दाखल करण्याच्या दिवशी भाजपचे तीन इच्छुक उमेदवार शिवसेनेत दाखल झाले. यात सर्वाधिक चर्चेत राहिले ते संजय भोईर. भाजपनं त्यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरू नये असे पत्र दिल्यामुळे त्यांना संधीच नव्हती. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन बारकू म्हात्रे यांनी त्यांना तात्काळ शिवसेनेची अधिकृत उमेदवारी देऊन एबी फॉर्म प्रदान केला. त्यामुळे संजय भोईर हे थेट शिवसेनेचे उमेदवार ठरले.
अशाच प्रकारे भाजपच्या अंजली गीते यांनाही उमेदवारीबाबत अडचणी आल्या. एकाच प्रभागात भाजपनं दुसऱ्यालाही फॉर्म दिल्याने त्यांच्या संधी धोक्यात गेल्या. ही परिस्थिती ओळखून वामन म्हात्रे यांनी अंजली गीते यांना शिवसेनेची उमेदवारी दिल्याची घोषणा केली.
बदलापुरातील भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सूर्यकांत धुळे यांचीही उमेदवारी नाकारण्यात आल्याचे बोलले जात होते. अर्ज भरण्याच्या सायंकाळी त्यांनीही अचानक वामन म्हात्रेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश जाहीर केला. यापूर्वी अविनाश भोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्मिता कांबळे यांच्या प्रवेशामुळेच भाजप–राष्ट्रवादी युतीला धक्का बसला होता. आता या तीन नव्या प्रवेशांमुळे भाजपमधील नाराजांना गळाला लावण्याची शिवसेनेची मोठी चाल यशस्वी ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, पिसेकर कुटुंबीयांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. बदलापूर गावातील भाजपचे जुने कार्यकर्ते असलेल्या पिसेकर कुटुंबाला उमेदवारीचे आश्वासन दिले होते, परंतु ते न मिळाल्याने त्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याची माहिती वामन म्हात्रे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजप नेतृत्वाने सुचवल्याप्रमाणे काम न झाल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत आदेशांबाबत नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत.























