बदलापूर : रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी बदलापूर आणि कर्जत दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गांच्या म्हणजेच चौपदरीकरण प्रकल्पाच्या कामाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट 3B (MUTP-3B) अंतर्गत राबवला जाणार असून आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने याला नुकतीच मान्यता दिली होती.
बदलापूर–कर्जत चौपदरीकरण प्रकल्पाची लांबी 32.46 किलोमीटर इतकी असून तो सध्याच्या रेल्वे मार्गालगतच विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पात बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी रोड आणि कर्जत या सहा प्रमुख उपनगरीय स्थानकांचा समावेश आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 37.79 हेक्टर खाजगी जमिनीची आवश्यकता असून त्याशिवाय शासकीय आणि रेल्वेची जमीनही वापरली जाणार आहे. या चौपदरीकरणासाठी अंदाजे 1,324 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा खर्च महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय संयुक्तपणे उचलणार आहेत.
या चौपदरीकरणामुळे कल्याण–कर्जत विभागात मुख्य (मेल/एक्सप्रेस) आणि उपनगरीय रेल्वे वाहतूक पूर्णपणे वेगळी करता येणार आहे. त्यामुळे लोकल सेवेला अधिक वेळेवरता येईल तसेच प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. उपनगरीय स्थानकांवरील ताण कमी होऊन प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
तसेच या प्रकल्पामुळे देशातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई–चेन्नई हाय डेन्सिटी कॉरिडॉरची वहनक्षमताही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. उपनगरीय आणि मुख्य रेल्वे वाहतूक वेगळी करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या चौथ्या रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहण करावे लागणार असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या 3 ते 4 वर्षांत प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे.























