बदलापूर: बदलापूर व अंबरनाथ नगरपरिषदांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नगराध्यक्ष निवडून येत असल्याने हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, यंदाच्या नगराध्यक्ष निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश मिळवत हा गड अखेर सर केला आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रभावी नियोजन व प्रचाराचा मोठा परिणाम दिसून आला. बदलापूर नगराध्यक्ष पदावर भाजपच्या रुचिता घोरपडे तर अंबरनाथ नगराध्यक्ष पदावर भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून शिवसेनेकडे असलेला बदलापूर–अंबरनाथचा राजकीय गड कोसळल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बदलापूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या रुचिता घोरपडे आणि शिवसेना (शिंदे गट)च्या विना म्हात्रे यांच्यात खरी लढत रंगली होती. या लढतीत रुचिता घोरपडे यांनी ५६ हजार ९७० मते मिळवत विजय मिळवला. सदस्य पदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) प्रत्येकी २३ जागांवर, तर काँग्रेस ३ जागांवर निवडून आली आहे.
अंबरनाथ येथे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील आणि शिवसेना (शिंदे गट)च्या मनीषा वाळेकर यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. अखेर तेजश्री करंजुले पाटील यांनी ५४ हजार ८६ मते मिळवत विजय खेचून आणला. तर सदस्य पदाच्या निवडणुकीत एकूण ५९ सदस्यांपैकी शिवसेना (शिंदे गट)चे २७, भाजपचे १४, काँग्रेसचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आणि २ अपक्ष सदस्य निवडून आले आहेत.
या निवडणुकीदरम्यान अंबरनाथ व बदलापूर येथे भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा झाल्या होत्या. या सभांमध्ये त्यांनी नागरिकांना “विकासाला मत द्या” असे आवाहन केले होते. नागरिकांनीही विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत भाजपला कौल दिल्याने दोन्ही नगरपरिषदांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आल्याचे स्पष्ट झाले आहे.






















