बदलापूर: कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचाच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे अंतिम करून उमेदवारी अर्ज भरले. निवडणूक जिंकण्यासाठी दिग्गजांनी कंबर कसली असतानाच त्यावेळी बदलापूरच्या राजकारणात नातेसंबंधांचे प्रबळ वर्चस्व असल्याचे दिसून आले. तब्बल 12 दाम्पत्य या निवडणुकीत उतरले असून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी मिळालेली आहे.
निवडणुकीत कुठे पती-पत्नी, कुठे पिता-पुत्र, तर कुठे भाऊ-भावजय, दीर-भावजय अशी नात्यागोत्यांची जुळवाजुळव स्पष्टपणे राजकीय रंग दाखवत आहे. विशेष म्हणजे या 12 पैकी 11 दाम्पत्य शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन मोठ्या पक्षांमधील आहेत.
भाजपकडून गटनेते राजेंद्र घोरपडे-रुचिता घोरपडे, ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे-उर्मिला शिंदे, शहराध्यक्ष रमेश सोळसे-हर्षदा सोळसे, माजी शहराध्यक्ष शरद तेली-कविता तेली, सुरज मुठे -संध्या मुठे, तसेच सागर घोरपडे -निशा घोरपडे या दाम्पत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर शिवसेना शिंदे गटातही नात्यागोत्यांचा जोर तितकाच अधोरेखित होतोय. शहरप्रमुख वामन म्हात्रे-विना म्हात्रे, त्यांचे भाऊ तुकाराम म्हात्रे-उषा म्हात्रे, प्रवीण राऊत -शीतल राऊत, श्रीधर पाटील -स्वप्ना पाटील, जयश्री भोईर -मुकुंद भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . याचबरोबर वामन म्हात्रे यांचे पुत्र वरूण म्हात्रे आणि पुतणे भावेश म्हात्रे हे देखील लढतीत आहेत. रासपकडून रुपेश-सुषमा थोरात यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
या सर्व घडामोडींमुळे बदलापूर शहरात नात्या-गोत्यांच्या राजकारणाची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र पक्षनेत्यांनी मात्र उमेदवारीचा आधार “पूर्वीचा अनुभव, प्रभागातील कामगिरी आणि जिंकण्याची क्षमता” असल्याचे सांगत पती-पत्नी व कुटुंबीयांची उमेदवारी समर्थित केली आहे.महत्वाचं म्हणजे, संभाव्य उमेदवारांपैकी सुमारे 90% उमेदवारांचे नगरसेवक म्हणून आधीच कामकाजाचा अनुभव असल्याचे समोर आले आहे. बदलापूरच्या राजकारणात म्हात्रे, घोरपडे, राऊत, पाटील या कुटुंबांचे वर्चस्व यापूर्वीही ठळकपणे जाणवत होते. आता पुन्हा एकदा याच कुटुंबीयांनी आघाडी घेतल्यास सभागृहात १२ जोडपी आणि एकाच कुटुंबातील ६ सदस्य शहराचा कारभार चालवताना दिसण्याची शक्यता आहे.























