बदलापूर : शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक समस्येला सामोरे जावे लागते. शहरात उपलब्ध असलेल्या एकमेव उड्डाणपुलावर वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात भार पडत असल्याने शहरातील पूर्व आणि पश्चिम भागास जोडणाऱ्या दुसऱ्या उड्डाणपुलाची मागणी लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना खुश करण्याकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणान मार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र उड्डाणपूलाच्या या निविदेला कोणताही प्रतिसाद न आल्याने उड्डाण पुलाकरिता निविदा नव्याने काढावी लागणार आहे त्यामुळे किमान २०२८ पर्यंत तरी बदलापूरकरांना उड्डाणपूलांसाठी वाट पहावी लागणार आहे.
बदलापूर शहरात पूर्व पश्चिम प्रवास करण्यासाठी सध्याच्या घडीला एकच उड्डाणपूल आहे. त्यामुळे बदलापूर शहराच्या कोणत्याही टोकाला असलेल्या वाहनचालकाला स्थानकाशेजारी असलेल्या मध्यवर्ती भागातील उड्डाणपुलाजवळ यावे लागते. तेथून पूर्व पश्चिम प्रवास करणे सोपे होते आहे. मात्र या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असते. त्यात उड्डाणपुलही अरूंद असल्याने उड्डाणपुलावरही वाहने संथगतीने चालतात. त्यामुळे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या सर्वच मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पूर्व पश्चिम वाहतुकीसाठी दुचाकी आणि रिक्षांसाठी उड्डाणपुलाखाली आणि बेलवली येथे अरूंद भुयारी मार्ग आहे. मात्र जोरदार पाऊस पडल्यास त्यात पाणी साचते आणि मार्ग बंद होतो. याचा फटका शहरातील शालेय विद्यार्थी, प्रवाशांना बसतो. त्यामुळे बेलवली येथे बदलापूर शहराच्या प्रवेशद्वारावर आणि कार्मेल शाळेपर्यंत नव्या उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली होती.
त्यासाठीची निविदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काढण्यात आली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये निघालेल्या या निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे एमएमआरडीएने यासाठीची निविदा नव्याने काढली. आता नऊ महिन्यांनंतर ही निविदा जाहीर करण्यात आली आहे. मात्र या निविदेलाही प्रतिसाद मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. विशेष म्हणजे निविदाकार मिळाल्यानंतरही कार्यादेश देऊन काम पूर्ण होण्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. बांधकामांचा इतिहास पाहता त्यात आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलापुरकरांना आणखी तीन वर्षे एकमेव उड्डाणपुलावरूनच प्रासा करावा लागणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. नव्या उड्डाणपुलासाठी २०२८ उजाडण्याची शक्यता आहे.
असा असणार आहे उड्डाणपूल
पूर्व पश्चिम जोडण्यासाठी बदलापुरातील दुसरा पूल बेलवली येथे लोटस तलावापासून सुरू होणार आहे. तो पूर्वेला कार्मेल शाळेजवळ उतरेल. दोन्ही बाजूंना दोन दोन मार्गिका चढण्या आणि उतरण्यासाठी असणार आहेत. उड्डाणपुलाची एकूण लांबी ७८० मीटर इतका असून तो १२ मीटर रूंद असणार आहे. बदलापूर शहरातील पूर्व पश्चिम प्रवासासाठी हा उड्डाणपूल महत्वाचा ठरणार आहे.






















