बदलापूर : प्रत्येक दिवशी मध्य रेल्वेवरील अपघातांच्या घटना वाढीस लागल्या आहेत. त्यातच बदलापूर स्थानक आणि स्थानकाबाहेर रस्त्यावरच रेल्वेने बांधकामाचे साहित्य ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय होते. फलाट, रस्त्यावर रेल्वेचे साहित्य असल्याने बदलापूर स्थानकातीत बांधकामाचा प्रवाशांना वास आणि नाहक त्रास सहन करावा लागत आहे . या बांधकाम साहित्यामुळे रस्त्यावरून चालताना अडथळे निर्माण होत आहेत. तसेच प्लॅटफॉर्मवरदेखील गर्दीत अधिक भर पडत आहे. यातून एखादा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण राहील, असा प्रश्न आता बदलापूरकरांना पडला आहे.
मध्य रेल्वेवरील जास्त प्रवासीसंख्या असलेल्या बदलापूर स्थानकात प्लॅटफॉर्म बंद, तिकीटघराची समस्या भेडसावत आहे. तर आता रेल्वेस्थानकाचे अद्ययावतीकरण सुरू असताना डेक उभारणीसाठी आणि सरकते जिने व लिफ्टचे काम करण्यासाठी वापरण्यात येत असलेले लोखंडी मोठमोठ्या आकाराचे साहित्य, खांब हे होम प्लॅटफॉर्म,प्लॅटफॉर्म नं.३ तसेच काही साहित्य हे प्लॅटफॉर्मबाहेरील पश्चिमेकडील भागात मुख्य रस्त्यालगत ठेवले आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी रस्त्यांवरून चालणाऱ्या पादचारी आणि प्लॅटफॉर्मवर गाडीसाठी उभे राहणाऱ्या प्रवाशांना चालायला, तसेच उभे राहण्यास जागाच नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आधीच एका बाजूने प्लॅटफॉम बंद केला आहे. त्यात होम प्लॅटफॉर्मवरून गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ असते. त्यात आधीच अरुंद बांधलेल्या या प्लॅटफॉर्मवर हे बांधकाम साहित्य ठेवल्याने लोकल पकडण्यासाठी उभ्या राहिलेल्या प्रवाशांना एक फूटदेखील जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत रेल्वेस्थानकावर अपघात घडता, तर त्याला जबाबदार कोण, असा सवात उपस्थित केला जात आहे. होम प्लॅटफॉर्मवर ठेवलेले लोखंडी सामान अडचणीचे ठरत आहे. आधीच होम प्लॅटफॉर्म अरुंद आहे. त्यात हे साहित्य ठेवल्याने प्लॅटफॉर्मवर उभे राहिण्यासाठी जागाच नसते. ऐन गर्दीत अपघात घडला किंवा या लोखंडी साहित्यावर कोणी आदळले, अशी अपघाताची भीती प्रवाशांमध्ये वर्तवली जात आहे . त्यात संध्याकाळी कामावरून घरी परतताना मुख्य बाजारातसुद्धा रेल्वेने ठेवलेल्या या सामानामुळे रस्त्यावरून चालायला जागाच मिळत नाही.























