दलापूर :- निवडणुका आल्या की मेट्रोचे गाजर दाखवले जाते. मात्र कांजुरमार्ग बदलापूर ही मेट्रो आणखी १५ वर्षे येऊ शकणार नाही, असा खळबळजनक दावा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केला आहे. त्याचवेळी ठाणे भिवंडी कल्याण मेट्रोच्या विस्तारात मेट्रो ५ ही अंबरनाथच्या चिखलोलीपर्यंत लवकर येईल, असे सांगत भाजप आमदार किसन कथोरे यांच्या मेट्रो १४ मार्गाच्या भूमीपूजन आश्वासनातली हवा काढण्याचा प्रयत्न म्हात्रे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी निवडणुकीपूर्वी बदलापूर मेट्रोचे भूमीपूजन करू शकतो, असा दावा आमदार कथोरे यांनी केला होता.
पालिका निवडणुकांच्या तोंडावर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात भाजपा आणि शिवसेनेत मोठा संघर्ष पाहायला मिळतो आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या शहर कार्यकारिणीची घोषणा करत असताना भाजप आमदार किसन कथोरे यांनी कार्यकर्त्यांना विकासकामांच्या माध्यमातून बळ देण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी शहरात बहुप्रतिक्षित मेट्रो १४ चे भूमीपूजन लवकरात लवकर करू. निविदांना योग्यवेळी मंजुरी मिळाल्यास निवडणुकीपूर्वीच त्याचे भूमीपूजन होऊ शकते, असा दावाही आमदार किसन कथोरे यांनी केला होता. मात्र त्यानंतर त्यावरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी खळबळजनक दावा करत ही मेट्रोच पुढची १५ वर्षे येऊ शकणार नाही, असे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर शहरात चर्चांना उधाण आले आहे.
बदलापूर पूर्वेतील कात्रप परिसरात एका कार्यक्रमात बोलताना वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांनी केलेल्या घोषणेची हवा काढण्याचा प्रयत्न केला. निवडणुका आल्या की मेट्रोचे गाजर आपल्याला दाखवले जाते. पण ती मेट्रो पुढची १५ वर्षे बदलापुरात येणार नाही, असे वामन म्हात्रे म्हणाले. मी ही एमएमआरडीएत काम केले आहे. पीपीपी तत्वावर जी मेट्रो बदलापूर पर्यंत उभारली जाणार आहे त्यासाठीच्या निविदांना प्रतिसाद मिळत नाही. त्यासाठी जी लोकवस्ती पाहिजे ती सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे एमएमआरडीएतील तज्ज्ञांशी मी बोललो, त्यानंतरच मी हे वक्तव्य करत असल्याचीही पुस्ती म्हात्रे यांनी जोडली. मेट्रोचे गाजर दाखवले जाते पण मी बदलापूर मेट्रोवर कधीही चर्चेसाठी तयार आहे. कधीही मला बोलवावे, असे जाहीर आवाहन यावेळी म्हात्रे यांनी आमदार कथोरे यांना केले.
बदलापूर शहरात मेट्रो येणार पण मेट्रो १४ नाही तर ठाणे भिवंडी कल्याण ही ५ चा विस्तारीत भाग असलेली मेट्रो येणार आहे, असा दावाही म्हात्रे यांनी यावेळी केली. बदलापूर मेट्रोचा प्रस्ताव मागे पडला आहे. मात्र त्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्या प्रकल्पाची किंमत वर्षागणिक वाढत जाणार आहे. त्यातून उत्पन्न मिळाले तरच कंपन्या तीच्या उभारणीसाठी पुढे येतील. त्यामुळे वस्तुस्थिती तुम्हाला सांगणे गरजेचे आहे, असेही म्हात्रे म्हणाले. कांजुरमार्ग बदलापूर मेट्रोवरून म्हात्रे यांच्या दाव्याने शहरात नवी चर्चा रंगू लागली आहे. यावर आता आमदार कथोरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.























