(दर्शन सोनवणे )
अंबरनाथ : येथील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परस्पर लाटली असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे पालक आणि वांगणी मनविसेच्या विभाग अध्यक्षांनी अंबरनाथ पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे शाळेची तक्रार केली आहे. पश्चिम भागातील जावसई गाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. शासनाच्या सुवर्णमहोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना देण्यात योतो. यामध्ये इयत्ता १ ली ते ४ थी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना १००० रुपये आणि ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना १५०० आणि ८ वी पासून पुढे २००० रुपये अशी शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येते. मात्र जावसई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे प्रकरण त्यांच्या पालकांनी समोर आणले आहे. तसेच यातील धक्कादायक बाब म्हणजे शाळेतील रजिस्टरवर शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांना देण्यात आले असून तिथे पालकांच्या अंगठ्याचे ठसे तसेच स्वाक्षरी देखील आहेत. मात्र यातील धक्कादायक बाब म्हणजे, शाळेतील रजिस्टरवर असलेले अंगठ्याचे ठसे आणि स्वाक्षरी बनावट असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे. तसेच याबाबत लेखी तक्रार देखील पालकांनी गट शिक्षण अधिकारी विशाल पोतेकर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लाटणाऱ्या संबंधितांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वांगणी मनविसेचे विभाग अध्यक्ष जयेश केवणे यांनी केली आहे.
प्रतिक्रिया :
माझी मुलगी ईयत्ता आठवीत शिकत असतांना तिला शिष्यवृत्ती मिळाली नाही, मात्र शाळेच्या रजिस्टरवर शिष्यवृत्ती दिल्याची नोंद आहे. तसेच पालक म्हणून माझ्या स्वाक्षरी ऐवजी अज्ञाताच्या अंगठ्याचा ठसा आहे. मी कधीही अंगठ्याचे ठसे देत नाही, किंवा माझ्या कुटुंबातील इतर व्यक्तीचे हे ठसे नाहीत. या प्रकरणाची तक्रार आम्ही गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.
( सुनीता वाघे, पालक )
प्रतिक्रिया :
शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते. मात्र विद्यार्थ्यांचे खाते केवायसी किंवा इतर तांत्रिक कारणांनी बंद असल्यास शिष्यवृत्ती शाळेकडे परत येते. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे, विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती त्यांच्या पालकांकडे रोख स्वरूपात दिली आहे, याबाबत शाळेतील हे रजिस्टर आम्ही ताब्यात घेतले असून पालकांच्या तक्रारीनुसार चौकशी करण्यात येत आहे. चौकशी अहवाल शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेला सादर करण्यात येईल.
( विशाल पोतेकर, गट शिक्षण अधिकारी अंबरनाथ पंचायत समिती )























