अंबरनाथ : अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे नवरात्र उत्सवानिमित्त विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपली वेगळी छाप पाडणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा गौरवपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सहआयोजक आदर्श बदलापूर होते. समाजकारण, शिक्षण, आरोग्यसेवा, कला-संस्कृती, उद्योजकता, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत महिलांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला.
महिला सबलीकरण आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा सोहळा महत्त्वाचा ठरला. पतसंस्थेचे अध्यक्ष सुशांत कोठावदे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘नवरात्र उत्सव हा स्त्रीशक्तीच्या जागरणाचा उत्सव आहे. समाजात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव करणे ही आमच्यासाठी अभिमानाची चाव आहे. पतसंस्थेच्या वतीने पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक असलेले आदर्श बदलापूरचे संजय साळुंखे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आर्थिक भार उचलला. त्यामुळे पतसंस्थेत कोणत्याही प्रकारचा आर्थिक खर्च झाला नाही. यावेळी सन्मानित महिलांनीही आपली भावना व्यक्त केली. त्यांनी या सन्मानामुळे आत्मविश्वास दुपटीने वाढल्याचे सांगत, भविष्यात आणखी कार्य करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतसंस्थेच्या संचालिका पल्लवी पाटकर यांनी केले. आभार प्रदर्शन सचिव सोनाली कोठावदे यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल संस्थेचे कर्मचारी, व्यवस्थापक, दैनंदिन बचत ठेव प्रतिनिधी, संचालक मंडळ या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.























