राज्यात अखेर नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन दहा वर्षांनंतर होणाया या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १० नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असून १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. १८ नोव्हेंबरला छाननी, २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत, आणि २६ नोव्हेंबरला अंतिम यादी तसेच चिन्ह वाटप होईल. मतदान २ डिसेंबरला तर मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. या घोषणेने संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, शहरांमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीची चाहूल लागली आहे.
लोकशाहीचा पाया मजबूत करण्याची संधी
नगरपालिका ही शहराच्या विकासाचा पाया आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण यांसारख्या सेवांचा थेट संबंध नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी असतो. त्यामुळे नगरपालिका निवडणुका या फक्त राजकीय चढाओढ नसून, त्या स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेशी निगडित असतात. या निवडणुकांद्वारे नागरिकांना थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते.
दशकभराची प्रतीक्षा
मागील दहा वर्षां पासून नगरपालिकेमध्ये प्रशासकांच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे. २०२० साली निवडणुका होणार होत्या, परंतु कोरोना महामारीमुळे निवडणुका होऊ शकले नाहीत. या काळात अनेक विकासकामे थांबली, प्रशासकीय अनास्था जाणवली. आता अखेर लोकशाहीच्या नवचैतन्याचा काळ सुरू होत आहे. इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांनी गेल्या काही वर्षांत जे काम केले. त्याची खरी कसोटी आता लागणार आहे.
जबाबदार प्रचार आणि सुज्ञ मतदान
निवडणूक हा उत्सव असला तरी तो जबाबदारीचा क्षणही आहे. मतदारांनी जाती, धर्म, पंथ, किंवा केवळ पक्षनिष्ठा बाजूला ठेवून उमेदवारांच्या कार्यक्षमतेचा, प्रामाणिकतेचा आणि विकासदृष्टीचा विचार करावा. उमेदवारांनीही वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांऐवजी प्रश्नाधारित प्रचारावर भर द्यावा. शहराच्या विकासाचे नियोजन, पर्यावरण संवर्धन, वाहतूक व्यवस्थापन, पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन अशा मुद्यांवर ठोस भूमिका मांडणे आवश्यक आहे.
परिवर्तनाची हाक
दहा वर्षानंतर पुन्हा एकदा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याची संधी आपल्याला मिळत आहे. या निवडणुकीतून नव्या पिढीचे नेतृत्व उदयास येईल, नव्या विचारांची बीजे रोवली जातील, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक मतदाराने मतदान हा केवळ हक्क नव्हे तर कर्तव्य समजून पार पाडल्यास आपल्या शहरांचा विकास अधिक गतिमान होईल.
नगरपालिका निवडणुका या केवळ राजकीय समीकरणे बदलण्याचा क्षण नाहीत, तर त्या आपल्या शहराच्या भविष्याचा आराखडा ठरवतात. म्हणूनच या निवडणुका स्वच्छ, पारदर्शक आणि मुद्देसूद व्हाव्यात हौच सर्व नागरिकांची अपेक्षा, दहा वर्षाची प्रतीक्षा संपली आहे. आता वेळ आली आहे सजग, जबाबदार आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची निवड करण्याची.























