दर्शन सोनवणे
अंबरनाथ : तहसील कार्यालयातील सेतू केंद्रातून दाखले मिळण्यास विलंब होत असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. शासकीय दाखले मिळण्याच्या विहित मुदतीत दाखले मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शैक्षणिक तसेच इतर शासकीय कामाकरिता तालुक्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातून नागरिक दाखले मिळवण्यासाठी तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात येतात. मात्र दाखले मिळण्यास विलंब होत असल्याने नागरिक तसेच दिव्यांग बांधवांना देखील हेलपाटे मारावे लागत आहेत. याबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रसारित होताच स्थानिक माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांनी शुक्रवारी सेतू केंद्राला भेट दिली. यावेळी नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रारींचा पाढाच वाचला. महिना उलटूनही उत्पन्न दाखल मिळत नसल्याची तक्रार एका महिलेने केली, तर एक अंध महिला देखील दाखला मिळवण्यासाठी सेतु केंद्रावर हेलपाटे मारवे लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत साळुंखे यांनी सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाब देखील विचारला. सेतू कार्यालयाने आठ दिवसात सुरळीत काम सुरू न केल्यास शिवसेना स्टाईलने जाब विचारणार असल्याचा इशारा साळुंखे यांनी दिला आहे.
तर मिळालेल्या माहितीनुसार सेतू कार्यालयाचे कामकाज चालवण्याचं कंत्राट जीएमके कंपनीला देण्यात आलं असून याठिकाणी कंपनीमार्फत सचिन घावट यांची व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी वैयक्तिक कारणास्तव व्यवस्थापक पदाचा राजीनामा दिल्याने आणि त्यांच्या जागी इतर व्यक्तीच्या नेमणुकीस तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राची मागणी केली. असे कंपनी प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयास लेखी पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे व्यवस्थापकाच्या अभावी सेतु केंद्रातील कामे रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तर याबाबत तहसीलदार अमित पुरी यांना विचारले असता, संबंधित व्यवस्थापकाने दिलेला राजीनामा अद्याप मंजूर झाला नाही, कंपनी प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले आहे. तसेच शासकीय दाखले वाटपाचे काम रखडले नसुन सेतू कार्यालयातून नियमितपणे दाखले वितरण सुरू आहे.अशी माहिती दिली.























