ठाणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा घाटकोपर आणि मुंबई काँग्रेस गुजराती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्र प्रदर्शन घाटकोपर पूर्व येथील शहिद स्मारक सभागृह येथे सादर करण्यात आले.
या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य प्रधानसचिव विजय परब, राज्य सरचिटणीस आरती नाईक, सुधीर निंबाळकर, रुपेश शोभा, यश सूर्यवंशी आणि मुंबई जिल्ह्यासहित, कल्याण, पनवेल येथील कार्यकर्ते तसेच काँग्रेसच्या वतीने माजी.नगरसेवक उपेंद्र दोशी,अब्राहम रॉय मनी, नगरसेविका नयना शेठ,- जिल्हाध्यक्ष ईशान्य मुंबई काँग्रेस, प्रद्युम यादव, मुंबई अध्यक्ष नसू आणि कार्यक्रमाचे सर्वेसर्वा केतन शहा उपस्थित होते.
यावेळी उपस्थिांना मार्गदर्शन करताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे चित्र प्रदर्शन सर्व शाळा ,कॉलेज मध्ये भरवणे गरजेचे आहे.हे प्रदर्शन समाजाला प्रेरणादायी ठरणार आहे.असे मत व्यक्त केले.
यावेळी उपस्थिांना मार्गदर्शन करताना अंनिसचे अध्यक्ष माधव बावगे म्हणाले की, जादूटोणा विरोधी कायदा देशभर व्हावा यासाठी महा. अंनिस करत असलेल्या प्रयत्नांना वर्षाताई आणि काँग्रेस पक्षाने सहकार्य करावे.तर देशातील अंधश्रध्दा दूर होतील.
कोणत्याही महापुरुषांच्या जयंती उत्सवातून त्या महापुरुषांचे कार्य किंवा विचार समोर येतात का ? या प्रश्नाचे उत्तर म्हणून महाराष्ट्र अंनिस घाटकोपर शाखेचे अध्यक्ष आणि मुंबई काँग्रेस गुजराती विभागाचे अध्यक्ष केतन शहा यांनी या संकल्पनेची मांडणी केली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित अशा वेगवेगळ्या 11 विभागात मांडणी केली. त्या विभागात वेगवेगळे फोटो आणि त्यांची थोडक्यात मांडणी अशी रचना केली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन कमिटीमध्ये केतन शहा, शहाजी पाटोदेकर, संदेश बालगुडे, संदेश खळे, कैलास भद्रीके, हिरालाल हरिया, नितीन पाटील यांनी काम पाहिले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणारे हे चित्रप्रदर्शन शाळा-कॉलेज, सार्वजनिक ठिकाणी लावले जावे. लोकांसाठी ते विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोचावे यासाठी त्याची निर्मिती केले असल्याचे आयोजकांनी सांगितले. या पहिल्या प्रदर्शनासाठी 500 पेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली होती. याबद्दल उपस्थितानी या उपक्रमाचे कौतुक केले.























