ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘मिशन भरारी’ या उपक्रमाला गती देण्यात आली आहे. या अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या इस्रो अभ्यास दौऱ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. जिल्हा नियोजन भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.
या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत कार्यरत विक्रम साराभाई अवकाश केंद्र, थुंबा समरेषीय रॉकेट प्रक्षेपण केंद्र आणि केरळ विज्ञान व तंत्रज्ञान संग्रहालय यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. तसेच तिरुअनंतपूरम आणि कन्याकुमारी येथील ऐतिहासिक स्थळांचाही अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचीही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, डॉ. बालाजी किणीकर, शांताराम मोरे, राजेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ‘मिशन भरारी’ हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक उपक्रम असल्याचे सांगितले. या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे ५० लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून, अल्पावधीतच ५९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या वैज्ञानिक संस्थांचा प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘मिशन भरारी’ हा केवळ शैक्षणिक उपक्रम नसून ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारा उपक्रम असल्याचे सांगितले. या स्पर्धेतून निवड झालेले ५९ विद्यार्थी हे ‘सायन्स सोल्जर्स’ असून भविष्यात देशाचे वैज्ञानिक म्हणून ते नेतृत्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी जिज्ञासा ठेवून प्रश्न विचारण्याची सवय जोपासावी, विज्ञान म्हणजे केवळ पाठांतर नसून शोध आणि विचारांची प्रक्रिया आहे, असेही त्यांनी नमूद केले























