ठाणे : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक महापालिकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून मंगळवार, 30 जानेवारी हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातून जिद्द आणि कर्तव्यभावनेचे दर्शन घडवणाऱ्या दोन घटना समोर आल्या आहेत.
ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक 26 (मुंब्रा–शैलशनगर परिसर) येथून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार संगीता दवणे यांनी गंभीर भाजलेल्या अवस्थेतही उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोमवारी सकाळी घरात स्वयंपाक करत असताना अचानक कुकरचा जोरदार स्फोट झाला. या दुर्घटनेत त्या गंभीररीत्या भाजल्या गेल्या असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मात्र, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवारीच असल्याने प्रकृती प्रतिकूल असतानाही त्यांनी माघार न घेण्याचा निर्धार केला. मंगळवारी सकाळी त्या थेट रुग्णवाहिकेतून मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयात दाखल झाल्या. वैद्यकीय कर्मचारी, पक्ष पदाधिकारी आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हीलचेअरवर बसून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या सादर केला. त्यांच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, ठाण्यातील नौपाडा परिसरात देखील एक भावनिक घटना घडली. भाजपचे उमेदवार सुनेश जोशी यांची उमेदवारी मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाली. मात्र, त्याच रात्री त्यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. कुटुंबावर शोककळा पसरलेली असतानाही त्यांनी सकाळी नियोजित वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केला.
या दोन घटनांमुळे ठाण्यातील निवडणूक प्रक्रियेत मानवी संवेदना, जिद्द आणि कर्तव्यनिष्ठेचा प्रत्यय आला असून या घटना सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.






















